निर्भीड न्यूज –
पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन जिथे कुठे थोडेबहुत पाणी उपलब्ध आहे, त्या पाण्याच्या काटेकोर वापरातून शेतकर्यांना समृद्धीचा मंत्र देणार्या ऊतिसंवर्धित डाळिंब पिकाबाबत व्यापक मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव आणि अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स, जळगाव येथे शनिवार, दि. 16 ते सोमवार दि. 18 एप्रिल दरम्यान ‘डाळींब उत्पादनातील आव्हाने व संधी’ या विषयावर राष्ट्रीय डाळींब परिषद 2016 चे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय डाळींब परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार करणार यांच्याहस्ते होणार असून महसूल तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांची प्रमुख पाहूणे म्हणून विशेष उपस्थिती राहील.
गुणवत्तापूर्ण डाळिंबाच्या उत्पादनांमुळे देशांतर्गत व देशाबाहेर मोठ्या प्रमाणात डाळिंबाची मागणी वाढली आहे. त्याचा शेतकर्यांना फायदा घेता यावा यासाठी परिषदेत राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञ व प्रगतशील डाळिंब उत्पादक शेतकरी आपल्या अनुभव व कौशल्याची माहिती शेतकर्यांना देणार आहेत. याचबरोबर टिश्यूकल्चर तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, झाडाची छाटणी, बहाराचे नियोजन व गुणवत्तापुर्ण उत्पादन, कीड व रोगाचे व्यवस्थापन अशा सर्व विषयांवर सचित्र सादरीकरणाद्वारे पहिले दोन दिवस मार्गदर्शन केले जाईल. परिषदेतला स्वतंत्र एक दिवस हा खास शिवार फेरीसाठी ठेवण्यात आला आहे. यात कुंभारखेडा, ता. रावेर येथील प्रगतीशील शेतकर्यांच्या डाळिंब बागांना भेट देण्यात येणार आहे.
या राष्ट्रीय डाळिंब परिषदेचा डाळींब उत्पादकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, आयोजन समितीचे अध्यक्ष व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आयोजन समितीचे सचिव डॉ. के. बी. पाटील, मारूती बोराटे व चेतन गुळवे (मो. क्र. 9404955317) यांच्याशी संपर्क साधावा.