निर्भीड न्यूज –
तांत्रिक शिक्षणाला अध्यात्मिक शिक्षणाची व मूल्याधिष्ठित शिक्षणाची जोड दिल्यास भारत देश जगाला मार्गदर्शन करेल, असे प्रतिपादन अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण यांनी आकुर्डी येथे केले.
पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट संचालित पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम पदवी प्रदान सोहळ्यात डॉ. पठाण बोलत होते. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मानद प्रा. डॉ. व्ही. एम. डोमकुंडवार, ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर, समन्वयक प्रा. सुनील ताडे, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी किरण पाटील आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. पठाण म्हणाले की, स्वामी विवेकानंदांना सध्याची प्रचलित शिक्षण पद्धती अभिप्रेत नव्हती. आपला देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे त्यावेळी शिक्षण पद्धतीत आपण अध्यात्मिकतेचा समावेश करू शकलो नाही. वास्तविक पाहता राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, चारित्र्य संवर्धन, गुरुंचा, माता-पित्यांचा आदर ही मूल्य शिक्षणातून मुलांमध्ये रुजविलीच पाहिजेत. दुर्दैवाने सध्याची विभक्त कुटुंबपदध्ती, शिक्षणाचे झालेले खासगीकरण यामुळे विद्यार्थी शिक्षकांपासून दूर गेला आहे. त्यामुळे शहरी भागात वृद्धाश्रमांची वाढलेली संख्या सध्याच्या व्यवस्थेत नवीन प्रश्न निर्माण करत आहे. यावर उपाय शोधायचा असेल, तर मूल्याधिष्ठित शिक्षण आणि नैतिक शिक्षण यांची जोड अभ्यासक्रमात द्यायला हवी आणि हे फक्त अध्यात्मिक शिक्षणातूनच होऊ शकते. अध्यात्मिक शिक्षण म्हणजे अंधश्रद्धा किंवा अंध:विश्वास नव्हे. असे झाले तर भारत जगाला मार्गदर्शन करेल, यात शंका नाही. सध्याच्या तरूण पिढीला स्वत:च्या धर्माची तत्वे माहित नाहीत. तर दुस-या धर्माची तत्वे माहित असल्याचा संबंधच येत नाही. अध्यात्माबद्दल अज्ञानी असलेल्या अशा युवकांचा समाजातील काही विघातक शक्तींकडून गैरउपयोग केला जातो. हे रोखायचे असेल, तर शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. पठाण यांनी केले.
मयांक गुप्ता, इद्रीस मोहंमद इजी, नेहा गिनोत्रा, अस्मिता बोधाले, शीतल चव्हाण, मधुरा गोळे, अक्षदा साबळे, मधुरा देशमुख, अंकिता वाळुंज या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, पदवी मिळवून आपण एक जबाबदार सुसंस्कृत नागरिक म्हणून समाजात आपले, आपल्या आई-वडिलांचे व संस्थेचे नाव उज्वल करावे.
प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना सांगितले की, अभियांत्रिकीमध्ये प्रवेश झाल्यापासून शेवटच्या वर्षांपर्यंत आपले महाविद्यालय उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देते. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासाठी व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागून ते विविध क्षेत्रात उत्तमपणे त्यांनी योगदान द्यावे यासाठी येथिल शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना आपल्या विद्यार्थ्यांचे यामध्ये भरीव योगदान असायला हवे.
डॉ. व्ही. एम. डोमकुंडवार म्हणाले की, विद्यार्थी हा शिक्षकाचा आत्मा असतो. तेच त्यांचे भांडवल असते. शिक्षकांना त्यांच्या प्रतिभेमुळे अनेक सन्मान मिळतात; परंतु आपल्या हातून घडलेला विद्यार्थी आपल्यापेक्षा उच्च पदावर नियुक्त होतो हाच शिक्षकांचा मोठा सन्मान होय. सर्वांनी आगामी काळात स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.
या पदवीप्रदान समारंभात 400 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. अंजली श्रीवास्तव, प्रा. अश्विनी वझे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रा. सुनील ताडे यांनी आभार मानले.