निर्भीड न्यूज –
देशभरासह महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे. त्यामुळे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. पिंपरी-चिंचवडच्या विकासात काँग्रेसचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतीश भोसले निश्चितच विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानगर प्रभाग क्रमांक आठसाठी पोटनिवडणूक होत आहे. रविवार, दि. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून, काँग्रेसचे उमेदवार सतीश भोसले यांच्या प्रचारार्थ दत्तनगर येथे बुधवार, दि. 13 एप्रिल रोजी सभा घेण्यात आली. या वेळी कदम बोलत होते.
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, काँग्रेस कमिटीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे, उमेदवार सतीश भोसले, आमदार रामहरी रुपनवर, नगरसेवक सदगुरु कदम, माजी महापौर कविचंद भाट, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महापालिका शिक्षण मंडळ सदस्य विष्णूपंत नेवाळे, माजी नगरसेवक रामचंद्र माने, संदीपान झोंबाडे, काँगेसच्या महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, शामला सोनवणे, सुदाम ढोरे, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, विशाल कसबे, काँग्रेसच्या उत्तर भारतीय विभागाच्या जेष्ठ नेत्या बिंदू तिवारी, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नदीम मुजावर, राजेंद्रसिंह वालीया, मयूर जयस्वाल, अॅड. क्षितीज गायकवाड, चिंतामणी सोंडकर, मकर यादव, सचिन कोंढरे, राधिका अडागळे, गौतम आरकडे, उमेश बनसोडे, तानाजी काटे, सुमित्रा पवार, हिरामण खवळे, मॅन्यूअल डिसुझा, नासीर चौधरी, शहाबुद्दीन शेख आदी या वेळी उपस्थित होते.
पतंगराव कदम म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसने लढा दिला. देशासाठी त्याग करण्याची या पक्षाला मोठी परंपरा आहे. देशभरात सत्ताधा-यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. देशासह महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची लाट आली आहे. त्याची सुरुवात या पोटनिवडणुकीपासून करायची आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ही पोटनिवडणूक लादण्यात आली आहे. याचा मतदारांनी विचार करावा. भाजप-शिवसेनेने सर्वांची फसवणूक केली असून, त्याला चोख उत्तर द्यायचे आहे. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. बिहारमध्येही भाजपाला यश आले नाही. आता काही राज्यांची निवडणूक होत असून, तेथील मतदारही भाजपाला नाकारतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेची 2017 मध्ये सार्वत्रिक निवडणूक आहे. त्यावेळी महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवायचा आहे. त्यासाठी पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्याला काम करायचे आहे. आता परिवर्तन व्हायला लागले आहे. या पोटनिवडणुकीचे परिणाम 2017 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीवर निश्चितपणे होतील.
सचिन साठे म्हणाले की, या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिलेला उमेदवार सर्वसामान्य आणि स्थानिक आहे. काँग्रेसच्या काळात दत्तनगर येथील एकही झोपडी पाडू दिली नाही. याही पुढे येथील सर्वसामान्यांच्या झोपड्यांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेईल. काँग्रेस सर्व धर्म समभावाने काम करीत आहे. दीन-दलित आणि अल्पसंख्यांकांवर सत्तेत आल्यानंतर भाजप-शिवसेनेने अत्याचार सुरू केले आहेत. त्यामुळे या घटकांना असुरक्षित वाटत आहे.
उमेदवार सतीश भोसले म्हणाले की, मी याच प्रभागातील उमेदवार आहे. मी स्वत: झोपडपट्टीतील असल्यामुळे येथील समस्या मला माहीत आहेत. येथील नागरिकांच्या अडीअडचणींची जाण असल्याने आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानेच काँग्रेसने मला संधी दिली आहे. मतदारांनी मला संधी दिल्यास मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवीन.
आमदार रुपनवर म्हणाले की, केवळ आठ महिन्यांसाठी ही पोटनिवणूक होणार आहे. त्यामुळे हा पूर्ण ‘पिक्चर’ नसून, केवळ ‘ट्रेलर’ आहे. सत्तेत आल्यानंतर भाजपाने फसविल्याची जनभावना आहे. भाजपाने सोनारांना आणि सराफांनाही हातोहात फसविले. त्यामुळे सत्ताधा-यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्वजण आता काँग्रेससोबत आहेत. काँग्रेसशिवाय कोणालाही राज्य करता येत नाही आणि गरिबांचे कल्याणही करता येत नाही. या पोटनिवडणुकीत सतीश भोसले यांचा विजय झाल्यास काँग्रेसमध्ये उत्साह संचारेल.
बाळासाहेब शिवरकर म्हणाले की, शाहु, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे इंदिरा गांधी यांनी संरक्षण केले. संयुक्त महाराष्ट्रासाठी काहीही न करणा-यांकडूनच महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने बोलण्यापेक्षा काम करण्यावर भर दिला. आज जो काय विकास झाला आहे तो काँग्रेसमुळे आहे. त्यामुळे कोणाच्याही खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका.
संदीपान झोंबाडे, बिंदू तिवारी, नदीम मुजावर आदींनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. नरेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले.