निर्भीड न्यूज –
गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने विजपुरवठा खंडीत होत असल्याने रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा लपंडाव थांबवून या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. त्वरित उपाययोजना करून सात दिवसांत ही समस्या सोडविण्यात यावी, अन्यथा थाळीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तापकीर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय औंधेकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, रहाटणी, काळेवाडी येथील श्रीनगर, शास्त्रीनगर, तापकीरनगर, ज्योतीबानगर आणि परिसरात गेल्या दहा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यापासून दिलासा मिळावा म्हणून नागरिक पंखे, कुलर, आणि एसीचा वापर करतात; मात्र वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने नागरिकांना ही उपकरणे वापरता येत नाही. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत नाही. परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांनाही अभ्यासाला अडचण निर्माण होत आहे.
महावितरणकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. या परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रहाटणी आणि काळेवाडी परिसरात अखंडित वीजपुरवठा राहण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. सात दिवसांत याबाबत कार्यवाही न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तापकीर यांनी निवेदनातून दिला आहे.