निर्भीड न्यूज –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीबाबत वास्तववादी विचार मांडणारे लेखक बी. एस. कांबळे यांच्या ‘जयंती महामानवाची’ या पुस्तकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. 14 एप्रिल रोजी करण्यात आले. पिंपळे सौदागर येथील महाबोधी बुध्द विहार येथे हा प्रकाशन सोहळा झाला.
माजी नगरसेविका सुभद्रा जगताप, प्रा. डॉ. रमेश रणदिवे, मारुती कदम यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय प्रवचनकार प्रा. दि. वा. बागुल यांचे या वेळी व्याख्यान झाले.
विजय जगताप, सागर जगताप, रमेश जगताप, दिगंबर जगताप, सुधाकर जगताप, सुहास जगताप, शिवाजी जगताप, सुरक्षा महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अनिस शेख, प्रा. राजू कदम, प्रा. शरद राऊत, अर्जून चौरे, देशभक्त क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम, करतारसिंह सरवदे, संतोष तिजोरे, किरण कांबळे, गोपाळ कांबळे, अमर कांबळे, केशव कांबळे, संघरत्न कांबळे यांच्यासह तक्षशिला सेवा संस्था, महाबोधी बुध्द विहार ट्रस्ट, यशोधरा महिला मंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
दि. वा. बागुल या वेळी म्हणाले की, जयंती साजरी करण्याच्या नावाखाली नको ते प्रकार केले जात असल्याचे आज बहुतांश ठिकाणी दिसत आहे. आपण साजरी करीत असलेली जयंती आदर्श पध्दतीने साजरी होणे आवश्यक आहे. महामानवांच्या विचारांना धरून आणि त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी ही जयंती साजरी होणे आवश्यक आहे; मात्र याबाबत फारसे कोणीही गांभिर्याने विचार केला जात नाही. लेखक बी. एस. कांबळे यांनी या विषयावर वास्तववादी लेखन केले आहे. जयंती महोत्सवात डीजे, कर्णकर्कश्य भोंगे यांतून ध्वनीप्रदूषण होते. हे प्रकार टाळले पाहिजेत. याबाबत ‘जयंती महामानवाची’ या पुस्तकातून भाष्य करण्यात आले आहे. बाबासाहेबांचे विचार जोपासले तरच त्यांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.