निर्भीड न्यूज –
परमेश्वर ही शक्ती मी मनापासून मानतो; पण अजून देव मला सापडत नाही. त्याचा नेमका पत्ता मला हवा आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. जो आपल्याला मनापासून भावतो तो देव, असेही ते या वेळी म्हणाले.
आकुर्डी येथील चिरंजीव पीठ ट्रस्टच्या वतीने प्रकाशन, व्याख्याने, पुरस्कार, भजनसंध्या अशा भरगच्च ज्ञानोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
निगडी प्राधिकरण येथील मनोहर वाढोकार सभागृहात शुक्रवार, दि. 15 एप्रिल रोजी पं. राजू सवार लिखित ‘दत्तभाव संभव’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. राजू सवार, राजीव जोगळेकर, डॉ. नूपुर जोगळेकर यांनी अभिवाचन केलेल्या ‘संदेश संहिता’ या सव्वाचार तासांच्या ध्वनिमुद्रिकेचे (ऑडिओ बूक) प्रकाशन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले; तसेच पं. राजू सवार यांनी संत मुक्ताबाई यांच्या ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या पहिल्या अभंगावर निरूपण केलेल्या 90 तासांच्या ‘योगी पावन मनाचा, संत सुखी व्हावे पाणी, मन मारूनी उन्मन करा, संती मानवा उपदेश, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, विश्व पट ब्रह्म दौरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या सात ध्वनिमुद्रिकांचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पुरंदरे बोलत होते. या वेळी ज्ञानोत्सव प्रमुख सर्वोत्तम जोशी, पं. राजू सवार, राजीव जोगळेकर, नूपुर जोगळेकर, पोपटलाल मुनोत, किशोर धूत, रमेश जोशी उपस्थित होते.
अभिनेते गिरीश कुलकर्णी म्हणाले की, समकालीन हाताला लागलेली सत्य देऊळच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. अध्यात्म व विज्ञान एकमेकास पुरक आहे दोन्हीचा हेतू सत्याचा शोध घेणे हाच आहे. मी श्रद्धेच्या विरोधात नाही उलट प्रेम, भक्ति या मूल्यांचा शोध घेण्याची गरज असल्याचे मला वाटते. अहंकार हा माणसातला दुर्गुण वाढत असून स्वतःत बुडून शोध घेण्याची कला लोप पावत असल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे म्हणाल्या की, रामायण, महाभारत ही महाकाव्य म्हणजे भारतीयांना लाभलेली मोठी देणगी आहे. आपण दैवी चमत्कारांबाबत वाचतो; पण वाल्याचा वाल्मीकी होणे हा मोठा चमत्कार होता. महाकवी म्हणून आदर्श जीवनाचे तत्वज्ञान उभे करू शकला. राम हा आपल्या चराचरात भरून राहिला आहे. अमूक गोष्टीत राम नाही, असे आपण म्हणतो. याचा अर्थ आपल्या सर्व कर्माचा अर्थ राम आहे.
पं. राजू सवार म्हणाले की, कर्मकांड, सोवळेओवळे यात आपण परमेश्वराला अडकवून ठेवले आहे. धारणांच्या तत्वातून देवाला मुक्त करून माणसात आणले पाहिजे.
गिरीश कुलकर्णी या वेळी म्हणाले की, मी देवाला जात नाही. पंढरपुरच्या विठ्ठलाचे मात्र मला अप्रुप आहे. पंढरीच्या विठ्ठलाचे मुखदर्शन जरी झाले, तरी डोळ्यांतून धारा येतात. का हे कळत नाही. याच मंदिरात अशी ओढ वाटते. इतर मंदिरांत अशी ओढ वाटत नाही. कारण, निरामय भक्ती तेथे पाहायला मिळते. आपण कुणाला विचारलं की, पांडुरंगाकडे काय मागितले, तर एकच उत्तर येते, ते म्हणजे ‘पुढील वर्षी वारी घडू दे.’ असा प्रेमभाव हवा. निरामय भक्ती आज पाहायला मिळत नाही.
अनिल खैरे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.