निर्भीड न्यूज –
भगवान महावीर यांनी जगाला अहिसेंची शिकवण दिली. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम जैनबांधवांकडून केले जात आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवित जैनबांधवांकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी देण्यात येत आहे, ही कौतुकाची बाब आहे, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.
भगवान महावीर यांची मंगळवार, दि. 19 एप्रिल रोजी जयंती आहे. ही जयंती साधेपणाने साजरी करीत श्री वर्धमान जैन श्रावक संघ आकुर्डी व जैन युवक-युवती संघटन यांच्यातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आकुर्डी येथे रक्तदान, दंतचिकित्सा आणि मॅमोग्राफी तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
आमदार गौतम चाबूकस्वार, अशोक कुमार पगारीया, प्रकाश कटारीया, सुभाष सुराना, सूर्यकांत मुथियान, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी, प्रकाश मुनोत, जवाहर मुथा, राजेंद्र खिंवसरा, धनराज छाजेड आदी या वेळी उपस्थित होते.
या शिबिरात 380 जणांनी रक्तदान केले. 255 महिलांची मॅमोग्राफी तपासणीही या वेळी करण्यात आली. दंतचिकित्सा शिबिरालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये निगडी येथे झालेल्या दिक्षा समारोहात दानशुरांनी 80 हजारांचा निधी दिला होता. तसेच महावीर जयंतीनिमित्त जैन बांधवांकडून निधी दान करण्यात येत आहे. 80 हजार रुपये आणि जयंतीनिमित्त संकलित होणारा निधी असे तब्बल सव्वा ते दीड लाख रुपये दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत. 1 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा निधी प्रदान करण्यात येणार आहे.
किरण खाबिया, संकेत पोखर्णा, मनोज शेलोत, आनंद पटवा, यश कुंकूलोळ आदींनी संयोजनात सहभाग घेतला.