निर्भीड न्यूज –
उन्हाळ्यातील सुट्टी वाया न घालवता विद्यार्थ्यांनी धम्मसंस्कार शिबिरांचा लाभ घ्यावा. जेणेकरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे त्यांच्या जडणघडणीस मोलाचा हातभार लागेल. त्यासाठी प्रत्येक बुध्दविरातून धम्मसंस्कार वर्ग सुरू झाले पाहिजेत, असे मत समन्वयक सुरेश कसबे यांनी व्यक्त केले.
चिंचवडच्या शाहूनगर येथील धम्मचक्र बुध्दविहारात धम्मशिबिर सुरू करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सुरेश कसबे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
भदन्त विसुद्ध पद्माश्री (बुद्धगया), भन्ते चंद्रज्योती, भन्ते अश्वजित; तसेच धम्मचक्र बुध्दविहार समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या वेळी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी 48 मुली आणि 27 मुले असे एकूण 77 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या शिबिरात सहभाग घेतला. भन्ते अश्वजित यांनी हा धम्मसंस्कार वर्ग सुरू केला असून, ते स्वत: या शिबिरात मोफत मार्गदर्शन करणार आहेत.
भन्ते अश्वजित याबाबत म्हणाले की, सलग दोन महिने सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत या वर्गात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बुध्दपूजा, त्रिरत्न वंदना, जयमंगल अष्टगाथा आदी वर्गातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. विहार म्हणजे काय, विहारात कशासाठी आणि कसे आले पाहिजे, बुध्द, धम्म संघ म्हणजे काय, बौध्दांनी काय केले पाहिजे, काय करू नये आदी प्रश्नांचे निरसन करून मार्गदर्शन केले जाईल.
कसबे या वेळी म्हणाले की, या शिबिरात विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाईल. असे धम्मसंस्कार वर्ग सुरू करायचे असल्यास संबंधिताना धम्मसंस्कार अभ्यासपुस्तक मोफत उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी संबंधितानी 9822273032 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही कसबे यांनी या वेळी केले.
गणवीर यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ अहिवले यांनी आभार मानले.