निर्भीडसत्ता न्यूज –
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी नोकरीसाठी विविध ठिकाणी प्रयत्न करतात. काही विद्यार्थ्यांना भरपूर प्रयत्न केल्यानंतर देखील नोकरी मिळत नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. कुठल्याही कंपनी किंवा कार्यालयातील नोकरीच्या प्रक्रियेला सामोरे जाताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांमध्ये कार्यालयीन शिष्टाचार असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यावरून संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जातो, असे मत महिंद्रा प्राईड स्कूलच्या प्रशिक्षक शिल्पा खुणे यांनी व्यक्त केले.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत महिंद्रा प्राईड स्कूल-नांदी फाउंडेशनच्या वतीने निगडी येथील नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व कार्यालयीन शिष्टाचार’ याविषयी दहा दिवसीय उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाची सांगता आज (शनिवार, दि. 30) झाली. या सांगता समारंभात शिल्पा खुणे बोलत होत्या.
कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, महाविद्यालयाचे प्राचार्य वैभव फंड, महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. बी. एस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडी या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
शिल्पा खुणे पुढे म्हणाल्या की, आदरातिथ्य हे क्षेत्र हॉटेल व्यवसायाशी निगडित आहे. यामध्ये शिष्टाचार हे मुलतत्व आहे. विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण आपल्यातील कमतरता आणि नोकरीसाठी लागणारी आवश्यकता या गोष्टी जाणून घेणे फार गरजेचे असते. त्यामध्ये कार्यालयीन शिष्टाचार, एखाद्याविषयी मत व्यक्त करणं, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन यांसारख्या विविध गोष्टी शिकणं अत्यंत महत्वाचे आहे.
एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जाताना त्यांना कोणत्या प्रकारचा कर्मचारी हवा आहे. त्या पदासाठी त्यांच्या अपेक्षा काय आहेत, याचा अभ्यास करून त्यांच्या निकषांमध्ये आपण बसतो का? हा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने प्रथम करावा. ति-हाइताशी बोलताना आपण कसा संवाद साधला पाहिजे, जेणे करून तो संवाद उत्तम संवाद होईल व समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक भावना येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
महिंद्रा प्राईड स्कूलच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख सीमा भागवत म्हणाल्या की, महिंद्रा प्राईड स्कूलची सुरुवात 2007 साली झाली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना आयटी, रिटेल, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात जाण्यासाठी प्रशिक्षित करणे हा महिंद्रा प्राईड स्कूलचा मुख्य उद्देश आहे. यानुसार राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन तसेच महिंद्रा प्राईड स्कूलच्या केंद्रावर येणा-या विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. समाजात असलेली आर्थिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे.