निर्भीडसत्ता न्यूज –
क्रिकेट माझ्या रक्तात आहे लग्नाच्या मांडवातून क्रिकेटच्या मैदानात लगेचच उतरण्यास मला अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त करत विराट कोहली टीम इंडियासह दक्षिण आफ्रिका मोहिमेवर निघाला आहे. आफ्रिका दौऱ्यात यश मिळवण्यासाठी सातत्य राखावे लागेल, असे मत त्याने व्यक्त केले.
अनुष्का शर्माबरोबरच्या विवाहानंतर मुंबईत काल रात्रीपर्यंत स्वागत समारंभ साजरा करणारा विराट २४ तासांच्या आत टीम इंडियाच्या मोहिमेवर निघाला आहे. आज सायंकाळी तो दौऱ्यावर निघण्याच्या पत्रकार परिषदेस उपस्थित होता.
२०१७ मध्ये मायदेशात घवघवीत यश मिळवणाऱ्या भारताचा नववर्षात परदेशात कस लागणार आहे आणि त्याची सुरवात 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून होणार आहे. लग्न आणि स्वागत समारंभ हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा प्रसंग असला आणि त्यामुळे मी क्रिकेटपासून काही दिवस दूर असलो तरी तंदुरुस्तीसंदर्भातला माझा सराव सुरू होता, असे विराटने या पत्रकार परिषदेत सांगितले.