निर्भीड न्यूज –
भारत ही आपली माता आहे, असे सांगत प्रत्येकाने ‘भारत माता की जय’ म्हटले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे; मात्र लातूरसह अनेक ठिकाणच्या माता पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. त्या माता आणि त्यांच्या समस्यांबाबत काहीही बोलले जात नाही. या मातांचा विचार होणे आवश्यक आहे; मात्र तो केला जात नाही. त्यामुळे ‘भारत माता की जय’ म्हणा, असे सांगण्याचा अधिकार सरकारला नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते बुधवार, दि. 20 एप्रिल रोजी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक उत्तम कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, कार्याध्यक्ष राहुल काकडे, चंद्रकांत वाकोळे, अॅड. राजेश नितनवरे, सिकंदर सूर्यवंशी, गौतम सोनवणे, महेंद्रसिंग आदियाल, कांता कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.
जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव, औंध कॅम्प आणि परिसरातील एकूण 42 संस्था, संघटना, मंडळे, संघ आणि बचत गटांनी एकत्र येत संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाअंतर्गत पीडब्ल्यूडी मैदानावर महिला बचत गटांचे विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलचेही उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. ‘भारतीय संविधान व सद्य स्थिती’ या विषयावर माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले.
डॉ. राऊत या वेळी म्हणाले की, देशात आज भ्रष्टाचार, दैववाद सुरू आहे. महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाईल म्हणून राज्य शासनाने न्यायालयाकडे शपथपत्र सादर केले. मात्र तशी अंमलबजावणी करण्यात आली नाही. या सरकारमध्ये ब्राह्मण्यवादी लोकं आहेत. घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. मात्र घटनेची अंमलबाजाणी होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगाव असलेल्या महू येथे त्यांची जयंती साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी उपस्थित होते. ही जयंती साजरी करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांचाही फोटो बाबासाहेबांच्या फोटोसोबत होता. ही बाब खटकणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांना कधीही सन्मान दिला नाही. तीच मंडळी बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून हेडगेवारांना आमच्या समोर घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे. ‘संघा’ने कधीही तिरंगा फडकाविला नाही, किंवा त्यांच्या कार्यालयावर तिरंगा कधीही लावला नाही. देशाचे संविधानही त्यांना मान्य नाही. तेच लोक आम्हाला ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगत आहेत. काय अधिकार आहे त्यांना असे सांगण्याचा? कन्हैयाकुमार आणि रोहीत वेमुल्लाचा बाबासाहेब समजू शकतो; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बाबासाहेब मी समजू शकलो नाही. देशाची मान झुकू देणार नाही, असे मोदी सांगतात. संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळून ‘पंथनिरपेक्ष’ शब्द घुसडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.
सध्या हिंदू कायद्यानुसार बौध्द विवाह होतात. त्यासाठी बौध्द विवाह कायदा अस्तित्वात आला पाहिजे. मागासवर्गीयांसाठीचा निधी लोकसंखेच्या निकषानुसार पूर्णपणे मिळत नाही. हा निधी मागासवर्गीयांच्या विकासासाठी पूर्णपणे मिळाला पाहिजे. मुंबई येथील इंदू मिलच्या जमिनीचे हस्तांतरण होणे आवश्यक आहे. तसे न करता या भाजपा सरकारकडून केवळ भूमीपूजन करण्यात आले. हा या सरकारचा खोटारडेपणा आहे. आपल्या आयडॉलला बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या आयडॉलला पळविण्याचे काम सुरू आहे. हेच लोक बाबासाहेबांनाही देव बनवतील.
माजी न्यायाधिश बी.जी.कोळसे पाटील या वेळी म्हणाले की, माणूस माणसासारखा जगला पाहिजे. मूलभूत गरजा आणि वस्तू प्रत्येकाल्या मिळाल्या पाहिजेत. संविधानात याची तरतूद आहे. याचप्रमाणे आर्थिक शोषणमुक्तीचा प्रस्तावही बाबासाहेबांनी मांडला होता. औषध विक्रीतून कोणीही नफा न कमावता ती मूळ किंमतीत मिळावित, असा बाबासाहेबांचा आग्रह होता. अशा मूलभूत हक्कांचा मसुदा बाबासाहेबांनी तयारही केला होता. मुलभूत हक्क समितीच्या प्रमुखांकडे तो मसुदा सादरही करण्यात आला; मात्र त्यावेळी देशाची परिस्थिती बिकट होती. देशात अराजकता माजली होती. त्यामुळे या मसुदा आणि तरतूदीचा राज्य घटनेत समावेश होऊ शकला नाही.
या देशात गरिबांच्या पदरात काही पडायची वेळ येते तेव्हा कोणीतरी शुक्राचार्य उभे राहतात आणि गरिबांच्या पदरात काहीही पडत नाही. कॉंग्रेसने यांनी अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आणला; मात्र त्याची अंमलबजावणी काँग्रेस सरकारकडून झाली नाही. काँग्रेस नालायक, तर भाजप महानालायक आहे. कम्यूनिस्टांचेही तसेच आहे. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट अनेक वर्षे सत्तेत होते. याच पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत; मात्र कम्यूनिस्टांनी त्यांच्या सरकारमध्ये मुस्लिमांना एक टक्केही सहभागी करून घेतले नाही. या सर्व राजकीय पक्षांमध्ये ब्राह्मण्यवादी लोकं आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर आणि ब्राह्मण्यवाद आहे.
आरक्षणावरूनही सध्या बरीच चर्चा केली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी सरसंघचालकपदाचा राजीनामा द्यावा आणि त्या पदावर मागास किंवा दलितांना संधी द्यावी; मात्र तसे होणार नाही. खोटं काय आहे आणि सत्य काय आहे हे समाजापुढे मांडणे म्हणजे स्वतंत्र विचार होय. अशा स्वतंत्र विचाराची पिढी निर्माण व्हावी, अशी अपेक्षा बाबासाहेबांची होती.
सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुध्द लढणारे सैनिक तया व्हावेत म्हणून बाबाहेबांनी शिक्षणाचा मार्ग दाखविला; मात्र स्वतंत्र विचारांची पिढी निर्माण झाली नाही. कारण ज्यांनी आपल्याला हजारो वर्ष शिकू दिले नाही, त्यांनीच ठरवले की, आपण काय शिकायचे आणि त्यांनीच आपला अभ्यासक्रम तयार केला. त्यामुळे आपण जागे झाले पाहिजे. देशात भांडवलशाही आणि धर्मशक्तीची युती आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, तोवर घटनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली आहे, असे म्हणता येणार नाही.
बौध्दवंदनेसह या वेळी स्वागत नृत्यही सादर करण्यात आले. राहुल काकडे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन, आभार गौतम सोनवणे यांनी मानले.