निर्भीड न्यूज –
भारतात सुमारे साडेसहा हजारांवर जाती आहेत. यात सुमारे 3 हजार 743 जाती इतर मागास प्रवर्ग अर्थात ‘ओबीसी’मध्ये मोडतात म्हणजे तब्बल 52 टक्के जातींचा ‘ओबीसी’मध्ये समावेश होऊ शकतो. या सर्व जातींचा ‘ओबीसी’मध्ये समावेश झाला असता, तर त्या जातीच्या प्रत्येक माणसाला समजले असते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपले जीवनमान सुधारले आहे, आपल्याला आपले अधिकार मिळाले आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे प्रभावक्षेत्र वाढेल ही भीती येथील राजकारण्यांना होती. म्हणून त्यांनी बाबासाहेबांचे विचार ‘ओबीसी’ घटकापर्यंत पोचू दिले नाहीत. बाबासाहेबांचे विचार कुपीबंद करून त्यांना मर्यादित ठेवण्याचे षडयंत्र रचण्यात आले. त्यामुळे बाबासाहेब ‘ओबीसीं’चे होऊ शकले नाहीत, असे मत डॉ. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गुरुवारी दि. 21 एप्रिल रोजी डॉ. सुषमा अंधारे यांचे ‘ओबीसींचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले. इतिहासकार मा. म. देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, कार्याध्यक्ष राहुल काकडे, गौतम सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. अंधारे या वेळी म्हणाल्या की, बाबासाहेबांच्या चळवळीमुळे वाचणारे, लिहिणारे आणि ऐकणारे तयार झाले आहेत. बाबासाहेबांची चळवळ प्रत्येक टप्प्यावर यशस्वी व्हायची. आताची चळवळ प्रत्येक टप्प्यावर अयशस्वी होत आहे. याबाबत आपण विचार केला पाहिजे. कार्यक्रम, आंदोलन, संप, बंद यापुरती चळवळ मर्यादित ठेवण्यात आली आहे. फुले, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार ‘माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणे’ म्हणजे चळवळ होय. ही फुले, शाहू आणि आंबेडकरांची विचारसरणी आहे. अज्ञानी माणसांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचू दिले जात नाहीत. बाबासाहेबांची चळवळ ज्या-ज्या वेळी यासाठी पुढे आली त्या-त्या वेळी या चळवळीत फुट पाडण्यात आली. बाबासाहेबांनंतर चळवळीने अनेक टप्पे अनुभवले. या प्रत्येक टप्प्यावर चळवळीला विरोध करणारा शत्रू तयार झाला; मात्र हा शत्रु चळवळीला ओळखता आला नाही. राजा राजाच्या पोटी नव्हे, तर मतपेटीतून जन्माला यावा, अशी बाबासाहेबांची अपेक्षा; मात्र आपल्याकडे राजा अजूनही राजाच्याच पोटी जन्माला येत आहे. मतपेटीतून तो जन्माला येत नाही. बहुजन आणि ओबीसी आपल्याला मतदान करतील हेच मुळी चळवळीतील उमेदवाराच्या गावी नसते, तशी खात्री नसते. असे होण्यामागे काय कारणे आहेत, याचा आपण शोध घेतला पाहिजे.
बाबासाहेब हयात असताना त्यांचा पहिला पुतळा मराठा समाजाच्या बागल दाम्पत्याने कोल्हापूर येथे बिंदू चौकात उभारला. अशी अनेक उदाहरणे आणि पुरावे याबाबत देता येतील. आपल्याकडे नतद्रष्टांना जाती खूप लागतात. छत्रपती शाहू महाराजांना नाकारणारे नतद्रष्ट अजूनही या महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालविण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती. सम्राट अशोक यांच्याकाळातील ही अष्टप्रधान मंडळपध्दती होय. याचाच पुरस्कार महात्मा फुले यांनी केला आणि शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहिला. फुले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरू मानले. या सर्व शृंखलेत या महापुरुषांच्या जातींचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. सम्राट अशोक, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचाही जातीनुसार काही संबंध नव्हता. तसाच महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीनुसार काहीही संबंध नव्हता. या सर्व महापुरुषांच्या जाती वेगवेगळ्या असतानाही त्यांना समता आणि न्याय या धाग्याने जोडले. असे असतानाही या महापुरुषांना जातीत बांधण्यात येत आहे.
आपल्या देशात काही वर्षांपासून सातत्याने ‘सेफ्टी वॉल थेअरी’चे राजकारण केले जात आहे. अफवांचे राजकारण केले जात आहे. बाबासाहेबांचे प्रभावशाली विचार सर्वांना माहीत होऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जात आहेत. बाबासाहेबांचे विचार देशातील 52 टक्के ‘ओबींसीं’पर्यंत पोचले असते, तर हे सर्वजण बाबासाहेबांचे अनुयायी झाले असते, अशी भीती येथील राजकारण्यांना होती. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना या घटकांपर्यंत पोचू दिले नाही. त्यामुळे बहुजनाळलेले ब्राह्मण आपल्याला चालतील; परंतु ब्राह्मणाळलेले बहुजन चालणार नाहीत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न वेळेत सुटला असता, तर आता आंदोलनाची वेळ आली नसती. संसदेत प्रतिनिधीत्व नाही अशा समुदायाला बाबासाहेबांनी घटनेत अल्पसंख्यांक म्हटले आहे. दलित आणि मुस्लिमांची मते घ्यायची; मात्र त्यांना एकत्र येऊ द्याचे नाही, ही काँग्रेस आणि राजकीय पक्षांची निती आहे. सामान्य माणसाला न्याय देणारी बाबासाहेबांची चळवळ होती. हीच चळवळ पुन्हा रुजविण्याची गरज आहे. देशात केवळ धनदांडग्यांच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा होते. हे सर्व थांबवायचे असेल, तर आपण बाबासाहेबांना समजून घेतले पाहिजे, बुध्वत्व समजून घेतले पाहिजे. डोक्यातून जात गळून पडणे म्हणजे बुध्वत्व होय.
अध्यक्षीय व्याख्यानात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तन’ या विषयावर मा. म. देशमुख म्हणाले की, पूजा केल्याने नव्हे, तर विचार केल्याने विकास होतो. अज्ञानामुळे आपलीच माणसे आपल्याला दोष देतात. देशातील बहुजन समाजाचे वैचारिक वय केवळ पाच वर्षे आहे. त्यामुळे आपण परिपक्व झालो आहोत, असे म्हणता येणार नाही. येथील पुरोगामी म्हणवून घेणा-या बहुतांश जणांनाही वैचारिक बैठक नसते. आमची बैठक कळत न कळत मनुवादी होत आहे. आमचे महापुरुष आम्हाला कळले नाहीत. बाबासाहेबांना देशातील बहुजनांपर्यंत पोचवण्यात आम्ही कमी पडलो. मताच्या अधिकाराची आपण माती केली आहे. त्याची माती न करता मोती करणे आवश्यक आहे.
बाबासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे वागणे म्हणजेच त्यांची पूजा होय. आजकाल सेवेलाच खूप महत्व आले आहे. सेवा म्हणजे लाचारी होय. यात स्वाभिमान राहात नाही. त्यामुळे आम्हाला सेवा करायची नाही.
शेतक-याला कर्जमाफी देणे ही सेवा आहे. कर्ज घेण्याची वेळच येणार नाही, अशी व्यवस्था करणे म्हणजे परिवर्तन होय. परिवर्तनासाठी पंचक्षेत्रात नवीन मूल्ये प्रतिष्ठीत केली पाहिजेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक आदी क्षेत्रात ही मूल्ये आवश्यक आहेत.
जात जाण्यासाठी सुशिक्षण असावे. त्याशिवाय जात जाणार नाही. महिलांच्या शिक्षणावर घराचा दर्जा ठरतो. प्रत्येक जातीत सुमारे दोन टक्के प्रस्थापित असतात. अशाच प्रस्थापितांमधून अनेक मोठी माणसे घडली आहेत. सध्या या प्रस्थापितांमागे गेल्यास त्यांचा आपल्याला पाठिंबा असतो. त्यांच्या पुढे जायला लागल्यास ते आपल्याला लाथाडतात. हे थांबले पाहिजे. समाजातील प्रस्थापित पुढे आल्यास परिवर्तन होईल. असेही देशमुख म्हणाले.
ममता अंध अनाथ कल्याण केंद्राच्या अंध विद्यार्थ्यांकडून या वेळी ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल यांनी स्वागत केले. राहुल काकडे यांनी प्रास्ताविक, दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. वसंत कांबळे यांनी आभार मानले.