मेढा /जावळी
निर्भीडसत्ता न्यूज –
कुसुंबी गावच्या श्री काळेश्वरी देवीची यात्रा २ आणि ३ फेब्रुवारीला संपन्न झाली. या यात्रेस राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या सुमारे तीन लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थिती नोंदवली.
कुसुंबी तालुका जावली जि सातारा येथील श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून आली.यात्रेच्यावेळी होणारी पशूहत्या गेल्या काही वर्षांपासून बंद झाली आहे. पशुबळीचा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा आणि तालुका प्रशासन, पोलीस प्रशासनातर्फे यंत्रणा सज्ज ठेवली जाते. शुक्रवारी यात्रेनिमित्त देवीचा जागर, छबीना झाला. त्यादिवशी देवीच्या मंदिरापुढे भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुसºया दिवशी शनिवारी यात्रेचा शेवटा दिवस होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांचे लोंढे कुसुंबी गावात धडकत होते. भाविक खासगी वाहने, एसटी बसने कुसुंबीला जात होते.
कुसुंबी ग्रामपचांयतीच्यावतीने येणाºया भाविक भक्तांसाठी पाणी तसेच साफसफाई करून आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली होती. कुसुंबी गावातील श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिरात सर्वांना दर्शन सुलभ होईल, याची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सोय केली होती.
देणगी स्वरूपात जमा होणा-या लाखो रूपयांचे नेमके काय?
कुसुंबी गावात प्रवेश करण्यापुर्वी अलिकडे छोटे मंदिर आहे, त्यास देवीचे जुने ठाण असे मानले जाते. भाविक मोठ्या श्रद्धेने या जुन्या ठाणकातही रांगा लावतात. नुकत्याच झालेल्या यात्रेवेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी जुन्या ठाणकास भेट दिली. या ठिकाणी अद्यापही ट्रस्ट स्थापन झालेले नाही. तरिही सढळ हाताने मदत करा, मंदिराचा जिर्णोद्धार करायचा आहे, सोळा लाख रूपये खर्च आहे. असे आवाहन श्रद्धेपोटी यात्रेला हजेरी लावणा-या भाविकांना मंदिरात देणगी वसुलीसाठी बसलेल्यांकडून केले जात होते. तेथे मोठ्या प्रमाणावर देणगी जमा करण्यात आली. दरवर्षी असेच कारण पुढे करून देणगी स्वरूपात पैसे उकळले. सुधारणा मात्र काहीच दिसुन येत नाही. वर्षानुवर्षे यात्रेला आवर्जून येतो. काहीतरी सुधारणा घडतील अशी अपेक्षा असते. मात्र नेहमीच अपेक्षाभंग होत आहे. या ठिकाणी देणगी स्वरूपात जमा होणा-या लाखो रूपयांचे नेमके काय केले जाते? यांना विचारणारे कोणी आहे का? असा संतप्त सवाल भाविकांनी व्यक्त केला आहे.