निर्भीडसत्ता – औरंगाबादमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने समोरून येणाऱ्या एका रिक्षाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अॅपे रिक्षातील ९ प्रवासी ठार झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पैठण रोडजवळच्या नक्षत्रवाडी जवळ घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारोळा येथून पाण्याचा टँकर भरधाव वेगाने औरंगाबादच्या दिशेने येत होता. नक्षत्रवाडी येथील हॉलीवुड ढाब्यापासून जवळच असलेल्या बंजारा हॉटेल समोरील वळणावर टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टँकरने समोरून येणाऱ्या दुचाकीला अगोदर धडक दिली, त्यानंतर अॅपे रिक्षाला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अॅपे रिक्षाचा पार चक्काचूर झाला.
या अपघातात ९ प्रवासी ठार झाले. तर गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.