मेढा । जावळी
निर्भीडसत्ता न्यूज –
बारा बलुतेदार असलेली ग्रामव्यवस्था आता कधीच इतिहासजमा झाली आहे. अनुशासनाच्या सोयीसाठी राज्य सरकारने आता ग्रामीण भागासाठी सुयोग्य व्यवस्था केली असून तलाठी हा या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो मात्र हा दुवाच वेळेत नागरिकांच्या कामास उपलब्ध होत नसेल, तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न जवळीतील सोनगाव गावच्या नागरिकांना पडला आहे.
जावली तालुक्यातील सोनगाव येथे तलाठी सहा महिन्यापूर्वीच रुजू झाले असूनही एकही दिवस सोनगाव या गावी तलाठी कार्यलयात हजर झाले नाहीत.त्यामुळे येथील लोकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना सातबारा, खाते उतारे, उत्पनाचे आणि रहिवाशी दाखले कोणाकडे मागायचे असा प्रश्न पडला आहे. याठिकाणी कायमस्वरूपी तलाठी दिला नाही तर आरपीआयच्या वतीने आंदोलन केले जाईल असा सूचक इशारा तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सोनगाव, आर्डे, मरडमुरे ,बेलावडे या गावांचे तलाठी कार्यालय सोनगाव येथे आहे. येथील नागरिकांना नेहमीच विविध उतारे, दाखले, सातबारे यांची गरज भासते. मात्र या कार्यलयात तलाठीच नाही तर उतारे कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
नागरिकांना तलाठ्यांच्या सह्यांसाठी कित्येक दिवस थांबावे लागत आहे. तालुक्यातील मेढा या ठिकाणी नागरिकांना तहसील कार्यलयात जावे लागत असल्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी आरपीआयकडून केली जात आहे. विविध दाखले मिळत नसल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यांपासून नागरिकांना एकही दाखला मिळू शकलेला नाही. तलाठ्यांची एका कागदावर सही घेण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना मेढा गाठावे लागत आहे.
एक दाखला मिळवण्यासाठी मेढा येथे तीन ते चार दिवस हेलपाटे मारावे लागतात, तलाठी नसल्याने कधी कधी मेढा येथून माघारी यावे लागते, तलाठ्यांना फोन केल्यास लोकांना उद्या या परवा या, माझा वैयक्तिक फोन आहे, ऑफिस चा नाही, अशी उडवा उडवीची व अरेरावीची भाषा वापरत असतात त्यामुळे लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
तरी संबंधित तलाठी बदलून दुसरा कायमस्वरूपी तलाठी सोनंगाव येते द्यावा व लोकांची होणारी कुंचबना व हाल थांबवावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
दरम्यान, संबंधित तलाठी सोनगाव येथे कार्यालयाला आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस न थांबल्यास रिपाई जावलीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आरपीआयच्या जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिला आहे.