निर्भीड न्यूज –
- हमीभाव,लोकपाल नियुक्यांबाबत जनआंदोलन करावे
राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विषयीच्या कथित तक्रारी व जमीन व्यवहारांबाबत कागदपत्रांसह पुरावे समोर आल्यानंतर त्यावर अभ्यास करुन भूमिका घेऊ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व नंदकुमार सातुर्डेकर यांनी काल (दि.२) राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव, लोकपाल नियुक्यांबाबत अण्णांनी राष्ट्रीय स्तरावर जनआंदोलन उभे करावे अशी विनंती अण्णांना करण्यात आली. यावेळी उद्योजक भगवानराव पठारे, शिवचरित्रकार प्रा.नामदेवराव जाधव आदी उपस्थित होते.
तसेच राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील तक्रारींकडेही अण्णांचे लक्ष वेधले. दाऊदचे कथित फोन प्रकरण, भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण गाजत असताना महसूल मंत्री खडसे राजीनामा देत नाहीत. अण्णांनीच आता यात लक्ष घालून जनतेच्या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी भापकर व सातुर्डेकर यांनी केली. त्यावर याप्रकरणी पुरावे समोर आल्यावरच भूमिका घेऊ असे हजारे यांनी स्पष्ट केले.
चौकट : लोकशाहीसाठी निवडणूक चिन्ह हटवावे : मनी मसल पॉवरसाठी पॅनेल पध्दत
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी पॅनेल पध्दतीचा अवलंब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हद्दपार करणारा आहेे. त्यामुळे मनी मसल पॉवरचा वापर पक्षीय वर्चस्वाचीच शक्यता आहे.एकूणच मतपत्रिकेवरील चिन्ह हा प्रकार घटनाबाह्य आहे. त्यामुळे जनतेने इलेकक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतपत्रिकेवरील असलेले चिन्ह हटविण्याचा आग्रह धरावा.मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव व फोटो असावा. निवडणूक चिन्ह हटवावे. तरच ख-या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी निवडून जातील. पक्ष व पार्टीतंत्र कमजोर होईल.लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी हा बदल आवश्यक आहे असे स्पष्ट मत अण्णांनी व्यक्त केले.