मुंबई: सध्या क्रिकेट विश्वात आयपीएलचे वारे वाहत असले तरी क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती जून महिन्यामध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाची. यंदाचा विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारताच्या पंधरा सदस्यीय संघाची घोषणा पुढच्या सोमवारी म्हणजेच 15 एप्रिलला होणार असल्याची माहिती मिळली आहे.
मुंबईत विश्वचषकासाठीच्या खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात येणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका खेळला. त्यात भारतीय संघ 3-2 असा पराभूत झाला. विशेष म्हणजे भारताची मधली फळी कमकुवत असल्याचे या मालिकेत स्पष्टपणे जाणवले. त्यामुळे या संघात नक्की कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर, 2019 विश्वचषक स्पर्धेतले सामने हे राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवले जाणार आहेत. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम 4 संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत. पहिल्या फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत 16 जूनला मैदानात उतरणार आहे. तर, स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.