निर्भीडसत्ता न्यूज-
तळेगाव, दि. १० (प्रतिनिधी) – गेली अनेक वर्षे मावळ तालुका विकासापासून वंचित आहे. रस्त्यांची लक्तरे झालीत, पूल डळमळीत झालेत, दुर्गम खेडी सोयी-सुविधांपासून दूर आहेत. भाजप सरकारने आत्तापर्यंत लोकांची दिशाभूल केली आहे. निवडून आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याची वल्गना केली. ही योजनाही फसवी निघाली आणि हे भाजपचे सरकारही फसवे निघाले. अशा या फसव्या सरकारच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नका, असे प्रतिपादन नगरसेवक बापू भेगडे यांनी केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांचा मावळ तालुक्यात प्रचार दौरा सुरु असून जांभुळगाव येथे बापू भेगडे बोलत होते. यावेळी सुनिल शेळके, जांभूळगावचे उपसरपंच अंकुश करकरे, अमोल जांभुळकर, योगेश गाडे, माऊली जांभुळकर, रमेश गाडे, चंद्रभागा जांभुळकर, शकुंतला नवघणे, विमल चव्हाण,आशा जांभुळकर, चिंतामण कोकरे, बाळकृष्ण काकरे आधी उपस्थित होते.
विद्यमान सरकारने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांची फसवणूक केली आहे. या सरकारने आत्मचिंतन करायची गरज आहे. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अशा फसव्या सरकारच्या उमेदवाराला घरी पाठवले पाहिजे. मतदारांनी जागरूक राहून विकासकामे करणाऱ्या सुनिल शेळके यांनाच भरघोस मते देऊन निवडून आणावे, असे आवाहनही बापू भेगडे यांनी केले.