पुणे | निर्भीडसत्ता न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांना नामिबियावरून आणण्यात आले. त्या दिवसापासून रोज काही ना काही कारणाने हे चित्ते चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा यांची चर्चा होऊ लागलेली आहे. कारण रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यातला एक चित्ता सोबत आणणार, असे ते म्हणाले आहेत. पुणे येथे माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी याविषयीची माहिती दिली.
आठवले म्हणाले, भारतात आणलेले चित्ते आम्ही अजून पाहिलेले नाहीत. पण नॅशनल पार्कमधल्या एका चित्त्याला आम्ही दत्तक घेतले आहे. पंतप्रधान मोदींनी आणलेले चित्ते मी पाहायला जाणार आहे. आणि मिळाले तर तिथून एक चित्ता घेऊन येणार आहे. असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दलही भाष्य केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे. काँग्रेसने त्यांचा पक्ष मजबूत करायला हवा. नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे बच्चों का खेल नही हैं. अशा शब्दांत आठवलेंनी राहुल गांधींना सुनावले आहे.