पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अनेक अधिकारी व विभागप्रमुख नागरिकांना भेटत नाहीत. त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने संबंधित नागरिक थेट आयुक्तांना भेटतात. नागरिकांची भेट टाळण्याचे प्रकार घडू नये म्हणून सर्व अधिकारी व विभागप्रमुखांना खबरदारी घ्यावी, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी किती अधिकारी करतात, हे लवकरच स्पष्ट होईल.
नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी अधिकारी व विभागप्रमुखांना भेटण्यासाठी पालिका भवनात येतात. मात्र, दौरा, मिटींग, साईट व्हीजीट, रजा आदी विविध कारणांमुळे ते नागरिकांना भेटत नाहीत. वारंवार हेलपाटे मारूनही अधिकारी भेटत नसल्याने कामे अडून बसतात. त्यामुळे अधिकार्यांबाबत रोष व नाराजी वाढत आहे. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आयुक्तांची भेटतात. परिणामी, आयुक्तांना भेटणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब प्रशासकीय कामाकाजाच्या दृष्टीने अशोभनीय आहे, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
विभागप्रमुख भेटणार दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत
महापालिकेचे सर्व विभागप्रमुख व अधिकार्यांनी दुपारी 4 ते सायंकाळी 5 ही वेळेत नागरिकांना भेटावे. ती वेळ नागरिकांसाठी राखून ठेवावी. या वेळेत विभागाच्या बैठका, दौर्याचे आयोजन करू नये. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सर्व कार्यालयांनी त्यांच्या सूचनाफलकावर ठळकपणे लावावा. प्रत्येक नागरिकांचे म्हणणे पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावे. त्यांना आवश्यक सहकार्य करावे. दौरे व भेटीसाठी आठवड्यातील ठराविक दिवस निश्चित करावा. कार्यालयीन वेळेत विभागप्रमुख व अधिकार्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेनंतरच कार्यालय सोडावे. या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.