पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी गाव व पिंपळे सौदागर या भागांना जोडणार्या पवना नदीवरील समांतर पुलाचे काम कासव गतीने सुरू आहे. पुलाचे काम मुदत संपून वर्ष लोटले तरी, पुल तयार होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला तंबी दिली आहे. एप्रिलअखेरपर्यंत काम पूर्ण करण्यास बजावले आहे. त्या ठेकेदाराला दररोज 5 हजार रूपये दंड करण्यात येत आहे.
पुलाचे काम अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. 100 मीटर लांबीचा आणि 8 मीटर रूंदीचा हा समांतर पुल आहे. तर 3 मीटरचा पदपथ आहे. त्यासाठी सुमारे 13 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. ये-जा करणार्या वाहनांची जुन्या पुलावरून दिवसभर मोठी वर्दळ असते. सध्याचा पुल अरूंद असल्याने तेथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
कामाची मुदत दीड वर्षे होती. जून 2022 ला ती मुदत संपली आहे. काम संथ गतीने सुरू असल्याने महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने ठेकेदार व्ही. एम. मोतेरे कंपनीचे महागाई भाव वाढ देणे बंद केले. सहा महिन्यांची मुदतवाढ देत दररोज 1 हजार रूपये दंड लावला. ती मुदतही संपल्याने आता दररोज 5 हजार रूपये दंड लावला आहे. तरीही काम वेगात होत नसल्याने नाराजी वाढली आहे.
त्यामुळे आयुक्त सिंह यांनी अधिकार्यांसमवेत स्वत: पुलाच्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराला सक्त सूचना करीत एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे.
फेबु्रवारीअखेरपर्यंत स्लॅबचे काम पूर्ण करणार
आयुक्तांनी पुलाच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेेकेदारांला सक्त सूचना केल्या आहेत. एप्रिल 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामाने गती घेतली आहे. फेबु्रवारीअखेरपर्यंत पुलाच्या स्लॅबचे 100 टक्के काम पूर्ण होणार आहे, असे महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे कार्यकारी अधिकारी बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.