पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
निगडी ते रावेत उड्डाणपुल या बीआरटीएस मार्गाचे काम तब्बल आठ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. नेतेमंडळीची वेळ मिळत नसल्याने तो रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. तो मार्ग वाहतुकीसाठी आठवड्याभरात खुला न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.
सचिन काळभोर यांनी सांगितले की, हा मार्ग गेली आठ वर्ष रखडला होता. जागा ताब्यात न घेता महापालिकेने थेट बीआरटी मार्गाचे काम सुरू केले. संंबंधित शेतकरी न्यायालयात गेल्याने तसेच, जागा हस्तांतरणात तब्बल 8 वर्षाचा कालावधी गेला. या 45 मीटर रूंद मार्गाचे काम जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. त्यामुळे निगडीच्या भक्ती-शक्ती चौकापासून रावेतच्या मुकाई चौकापर्यंत केवळ दहा मिनिटात पोहचता येते. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
हे काम पूर्ण झाले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची 26 जानेवारी 2024 ची तारीख अचानक रद्द झाल्याने पुलाचे उद्घाटन करण्यात आले नाही. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तारीख मिळालेली नाही.
नेतेमंडळींची प्रतीक्षा न करता आयुक्तांनी हा मार्ग तातडीने वाहतुकीस खुला करावा. त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप हे शहरात बीआरटीएस मार्ग करण्यास आग्रही होते. त्यांच्यामुळे शहरात बीआरटीएस मार्ग तयार होत आहेत. त्यांच्या या संकल्पनेत या माध्यमातून अडथळा आणण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे, असा आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे. हा मार्ग आठवड्याभरात खुला न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काळभोर यांनी दिला आहे.