निर्भीडसत्ता न्यूज – शहारातील काही भागात कुठलाही वापर नसतांना नाल्यावर सिमेंचटे स्लॅब टाकले आहेत. त्यामुळे नाल्यातील कचरा स्लॅबच्या खाबांना अडकत असल्याने त्यापासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीने नागरिकांना आजार जडत आहेत. त्यामुळे तात्काळ शहरातील नाले सफाई करुन नाल्यावरील बिनकामाचे स्लॅब काढून घेण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष अजय पाताडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पाताडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याआधी महापालिका प्रशासनाच्यावतीने शहारातील सर्व नाल्यांची साफसफाई केली जाते. शिवाय नेहरूनगर भागामध्ये दोस्ती बेकरी ते नुरमुहल्ला तसेच संतोषी माता चौक ते महेशनगर असा नाला आहे. या नाल्यांची सफाई दर्शनी भागामध्ये मात्र आतमध्ये होत नाही. परिणामी पावसाळ्यामध्ये याचे परिणाम करदात्या नागरिकांना भोगावे लागतात. सांडपाण्याचा निचरा न झाल्याने मच्छरांचे प्रमाण वाढून रोगराईत वाढ होते.
दरम्यान, शिवशंभो मंगल कार्यालयाच्या शेजारी बिनकामाचा नाल्यावरच मोठा स्लॅब टाकला आहे. त्यामुळे स्लॅबच्या खांबाला कचरा अडकल्याने जवळ-जवळ ७० टक्के नाला कचऱ्याने भरला आहे. शिवाय काही ठिकाणी नाल्यावर घरे बांधण्यात आले असून आपआपल्या पद्धतीने नाले बंद केले आहेत. त्यामुळे नाल्यांची उंची, रुंदी पुर्वीपेक्षा कमी झाली आहे. याबाबत आयुक्तांनी स्वत; येवून पाहणी करून अतिक्रमे काढावी, अन्यथा प्रशासनाच्याविरोधात आवाज उठविला जाईल, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.