निर्भीडसत्ता न्यूज –
– नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व कमल घोलप यांची आयुक्त व स्थायी समिती अध्यक्षाकडे मागणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवात पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते परंतु महोत्सवात निधीची कमतरता भासत असुन कित्येक वर्ष या निधीमधे वाढ करण्यात येत नसल्यामुळे अजुन चांगल्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करता येत नसल्यामुळे महोत्सवाच्या निधीत वाढ करण्याची मागणी भाजप नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी पालिका आयुक्त, महापौर व स्थायी समिती अध्यक्षा यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात केंदळे व घोलप यांनी महापौर नितिन काळजे व स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांची भेट घेत मातंग समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,
“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवात १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या पाच दिवसात विविध लोकप्रबोधन व सामाजिक उपक्रमाचे सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य तळागाळापर्यंत अजुनही पोहचलेले नाही, “ज्या अण्णाभाऊंनी दिड दिवसाची शाळा शिकुन साहित्याचा डोंगर निर्माण केला, कथा, कादंबरी, लेख, वाड्मय असे सामाजिक संदेश देणारे शेकडो पुस्तकांचे लिखाण करत एक इतिहास निर्माण केला, ज्यांच्या कार्याची दखल रशिया सारख्या देशाने घेतली परंतु आजही आपल्या महाराष्ट्रात अण्णाभाऊची जयंती फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच करते, बाकीच्या शहरात अजुनही पालिकेच्या वतीने भव्य जयंती महोत्सव सुरु करण्यात आलेला नाही. अखंड महाराष्ट्राच्या लढयात अण्णाभाऊंचे मोलाचे योगदान आहे याचीही जान आपण राखली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात अण्णाभाऊ साठे यांना मानणारा व मातंग समाज मोठ्या प्रमाणावर आहे, गेल्या १८ वर्षापासुन भक्ती शक्ती चौकात अण्णाभाऊंची जयंती साजरी होते परंतु पालिका खर्च करत असलेल्या जयंतीच्या निधीमधे मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली नाही.
सन २०१६ च्या जयंती महोत्सवात थोडी वाढ करत दहा लाख रूपयांचा आर्थिक निधी उपलब्ध करण्यात आला होता, परंतु पूर्वीपासुन सात लाख रूपयांच्या पुढे हा आकडा सरकला नाही. यंदाच्या २०१७ च्या जयंती महोत्सवाचा निधी मोठ्या प्रमाणात वाढवुन ही रक्कम २० लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी आम्ही समस्त मातंग समाजाच्या वतीने करीत आहोत तरी याचा सकारात्मक विचार करण्यात यावा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरभर मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात यावी यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात विविध क्रिडा व कला स्पर्धाचे आयोजन, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, कुस्त्याचा जंगी सामना, निबंधस्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, पारंपरिक मैदानी खेळांचे आयोजन पालिकेच्या वतीने शहरभर करण्यात यावे तसेच जयंती महोत्सवात समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना जास्त टक्केवारीनुसार लॅपटॉप तसेच आर्थिक परिस्थितीमुळे शिकु न शकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, कला क्रिडा क्षेत्रात मोलाच कार्य करणाऱ्या मुलामुलींना पुरस्कार व रोखरक्कम, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कला क्रिडा अॅॅॅकेडमी सुरु करून त्यात गरजु मुलांना प्रवेश देवुन शिक्षणाचा खर्च यातुन करावा, त्याचबरोबर आदर्श माता पिता, आदर्श महिला बचत गट, आदर्श विद्यार्थी, आदर्श जेष्ठ नागरिक संघ अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति व संस्थांचा यथोचित मान सन्मान व पुरस्कार, अण्णाभाऊंचे साहित्य सर्व नागरिकांना समजण्यासाठी साहित्य दिंडी व प्रदर्शन याचे आयोजन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजना व इतर शासकीय योजनाच्या माहितीची जनजागृती, प्रत्येक शासकीय कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांचा फोटो लावण्यासाठी आर्थिक तरतुद इ. कार्यक्रमाचा महोत्सवात समावेश करण्यात यावा यासाठी जयंती महोत्सवाच्या निधीत चांगल्या पद्धतीने वाढ करण्यात यावी असे त्यात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी भाजप नेते बापु घोलप, शिवाजी साळवे, किशोर हातागळे, गणेश साठे, रूपल माने, दिपक झोंबाडे, राकेश बावणे, रवि खैरनार, सुर्यकांत गायकवाड, भिमाजी पानमंद आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.