निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे प्रसिद्धीलोलुप आहेत. कोणत्याही मुद्द्याचे राजकारण करायचे, मत्र्यांसोबत फोटो काढून पत्रकबाजी करायची आणि प्रसिद्धी मिळवायची याच एकमेव कामात बारणे यांनी आपल्या खासदारपदाचा कालावधी वाया घालवला. सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी जाहीर केलेली प्रारूप नियमावली सुटसुटीत असताना ती जाचक असल्याचे सांगून शहरातील नागरिकांना घाबरवण्याचे काम ते करत आहेत. एकीकडे भाजपचे उंबरे झिजवायचे आणि दुसरीकडे आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा बारणे यांचा हा उद्देश भाजप कदापीही सफल होऊ देणार नाही. हिंमत असेल, तर आता त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी. भाजप त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे आव्हान सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला आहे.
घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने थेरगाव येथे घेतलेल्या मेळाव्यात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी जाहीर झालेली प्रारूप नियमावली जाचक असल्याचा आरोप केला. त्याला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ पवार म्हणाले, सरकारने राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र हा विषय उच्च न्यायालयात असल्यामुळे तो सोडविताना प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावा लागत आहे. हा प्रश्न घाईगडबडीत सोडविल्यास भविष्यात नागरिकांनाच त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे नागरिकांना हा त्रास होता कामा नये, यासाठीच सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची प्रारूप नियमावली जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. आलेल्या योग्य हरकती व सूचनांचा अंतर्भाव करून अंतिम नियमावली जाहीर होणार आहे. असे असताना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे या प्रारूप नियमावलीवरून नागरिकांना घाबरवण्याचे काम करत आहेत.
प्रारूप नियमावली जाचक असल्याचे सांगून बारणे यांनी स्वतःच्याच अकलेचे तारे तोडले आहेत. बारणे हे प्रसिद्धीलोलुप राजकारणी आहेत, हे जगजाहीर आहे. शहरात आल्यानंतर सरकारवर टिका करायची, नंतर दिल्ली आणि मुंबईत मंत्र्यांसोबत चर्चा करताना फोटो काढायचे, त्यातून प्रसिद्धी मिळवायची, एवढे एकच काम बारणे यांना जमले आहे. केवळ प्रसिद्धी मिळविण्यातच आणि नागरिकांची दिशाभूल करण्यातच त्यांनी आपल्या खासदारपदाचा कालावधी वाया घालवला आहे. काही ठोस आणि रचनात्मक काम केले असते, तर मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे भले झाले असते. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेला खासदार मिळाल्यामुळे या मतदारांचे आतोनात नुकसान झाले आहे.
बारणे यांच्याकडे कोणतेही राजकीय नेतृत्वगुण नाहीत. ते जनाधार नसलेले नते आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांना घरच्या प्रभागातील पॅनल सुद्धा निवडून आणता आले नाही. त्यांच्याकडे नेतृत्वगुण आणि जनाधार असता, तर ते स्वतः राहत असलेल्या थेरगाव परिसराचा त्यांनी कायापालट करून दाखविला असता. बारणे हे भाजपमुळे खासदार होऊ शकले, ही वस्तुस्थिती आहे. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांना भाजपच्या मदतीचा विसर पडला आहे. तसेच केंद्राशी निगडित असलेले रेडझोन, नदीसुधार, लष्कराच्या हद्दीतील रस्ते, बोपखेलच्या पुलाचा प्रश्न त्यांना सोडविता आला नाही. त्यांनी हे सर्व प्रश्न केवळ फोटा काढण्यापुरतेच मर्यादित ठेवले. संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारले की प्रश्न सुटतात, असा त्यांचा समज झाला आहे. त्याची प्रसिद्धी मिळवून ते शहरातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते सरकारच्या प्रत्येक धोरणावर टिका करताना दिसून येतात. मात्र त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील असूनही शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत नाहीत. एकीकडे भाजपचे उंबरे झिजवायचे आणि दुसरीकडे नागरिकांची दिशाभूल करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात बारणे यांना धन्यता वाटत आहे. मात्र भाजप आणि शहरातील सुज्ञ जनता बारणे यांचा हा दुटप्पीपणाचा उद्देश कधीही सफल होऊ देणार नाही. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्याची हिंमत केवळ भाजपमध्येच आहे. हा प्रश्न आता कायमचा सुटण्याच्या मार्गावर असताना बारणे यांनी नागरिकांना कितीही घाबरवण्याचे काम केले तरी त्याला येथील नागरिक बळी पडणार नाहीत. हिंमत असेल, तर त्यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ, असे आव्हान पवार यांनी दिले आहे.