निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत खासगी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच्या बक्षिस योजनेसाठी अर्ज वाटप सुरू झाले आहे. दहावीच्या व बारावीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना हे बक्षिस मिळणार आहे.
इयत्ता दहावीच्या ८० ते ९० टक्के गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना १० हजार, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणा-यांना १५ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे. बारावीच्या परिक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना १५ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. या योजनेसाठी ७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१७ या कालावधीत विद्यार्थ्यांना पालिकेकडे अर्ज करता येणार आहे. नजिकच्या नागरी सुविधा केंद्रामधुन विद्यार्थ्यांना अर्ज मिळतील. तिथेच परिपूर्ण भरलेले अर्ज जमा करावेत. अर्ज जमा केलेची पोहोच पावती तेथून घ्यावी. पालक व कॉलेजच्या प्राचार्यांच्या शिफारस असलेल्या अर्जासोबत आधारकार्ड, गुणपत्रिका, रहिवाशी पुरावा, बँक पासबूक जोडणे आवश्यक आहे. पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांना धनादेशाव्दारे बक्षिसाची रक्कम सुफूर्द केली जाणार आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली आहे.