निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील गटप्रमुखांच्या निवडीवरून शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांचे गट आमने सामने आल्याने संघर्ष निर्माण झाला. याच वादातून आमदार समर्थकांनी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या राजारामपुरीतील कार्यालयावर मंगळवारी (ता. २२) हल्ला केला. ट्युबलाइट आणि सोड्याच्या बाटल्या फोडण्यात आल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.
दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप लिंग्रस यांनी केला आहे. ६० ते ७० जणांच्या जमावाने कार्यालयात गोंधळ घालून मोडतोडीचा प्रयत्न केल्याने लिंग्रस यांच्याकडून रात्री उशिरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला.