सैनिक टाकळी/ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील काही परिसरामध्ये गेले चार ते पाच दिवस पावसाने हा-हा कार माजवला असुन ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने अक्षरशा शिरोळ तालुक्यात थैमान घातले असून जून, जुलै व ऑगस्ट महिना संपूर्णपणे कोरडा पडला होता. मात्र या अचानक येणाऱ्या पावसामुळे अनेक गावातील अोढ्यावरून पुलावरून पाणी असोंडून वाहू लागल्याने या ठिकाणची वाहतूक खोळंबली होती. संपूर्ण जनजीवन कोलमडून गेले होते.
शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने सर्वच पिके धोक्यात आली असुन ऊस, भुईमुग, सोयाबीन, भाजीपाला व केळी या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गास आर्थिक फटका बसणार आहे.