रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रानजाई प्रतिष्ठान व आळंदी नगरपरिषद यांचा संयुक्त उपक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील नदी स्वच्छतेचा वसा रोटरी कल्बच्या सदस्यांनी घेतला आहे. पवनामाईच्या स्वच्छता अभियानाप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांनीही इंद्रायणी जलपर्णीमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (दि.15) आळंदी येथे सायंकाळी पाचच्या सुमारास इंद्रायणी घाटावर नदीची आरती करुन इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा रो. वर्षा पांगारे, प्रकल्प अधिकारी रो. राम भोसले, रो.आनंद सूर्यवंशी, रो.चिंतामणी अभ्यंकर, रो.रवींद्र भावे, रो.अनिल नेवाळे, रो.नानजीभाई ठक्कर (ठाणावला), रो. बाळासाहेब उ-हे, रो. सारंग माताडे, रो. संतोष जाधव, भाऊसाहेब पांगारे, रो. सदाशिव काळे आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, आळंदी नगरपरिषद, रानजाई व इतर निसर्ग प्रेमी व जलप्रेमी सामाजिक संस्था एकत्र येऊन हे अभियान राबवणार आहेत. संक्रातीनिमीत्त जलपूजा करून इंद्रायणी नदीची आरती करण्यात आली व त्यानंतर अभियानाला सुरुवात कऱण्यात आली. यावेळी घाट परिसर दिव्यांनी सुशोभित करण्यात आला होता.
रानजाई प्रतिष्ठानच्या आबा मसुडगे यांच्या संकल्पनेतून 1 जानेवारीपासून या इंद्रायणी स्वच्छतेला सुरुवात कऱण्यात आली. यामध्ये नदीपात्रात दोरी बांधून या दोरीला जलपर्णी अडवण्यात आली होती. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत जमा झालेली 15 ते 20 ट्रक जलपर्णी काढून टाकण्यात आली.
हा उपक्रम पुढे तीनवर्ष असाच सुरु राहणार असून केवळ आळंदी परिसरातीलच नाही तर संपूर्ण इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्त व कचरामुक्त करुन स्वच्छ करण्यात येणार आहे. यासाठी दर रविवारी नदी घाटावर जमून स्वच्छता करण्यात येणार असून यामध्ये नागरिकांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा रो. वर्षा पांगारे यांनी केले आहे.