निर्भीड न्यूज –
माणसे धर्माने नव्हे, तर कायद्याने बांधली पाहिजेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण होते. माणसांना जोडण्याची तरतूद घटनेतून बाबासाहेबांनी केली. त्याला कायद्याचे आणि आरक्षणाचे स्वरूप दिले. आरक्षण ही लाचारी नाही, तर ‘इमेज बिल्टअप’ करण्याचा प्रयत्न आहे, असे मत माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी व्यक्त केले.
सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि. 22 एप्रिल रोजी माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी व्याख्यानमालेतील समारोपाचे तिसरे पुष्प गुंफले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रनिर्मिती व उभारणीचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते.
नागपूर येथील राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, कार्याध्यक्ष राहुल काकडे, चंद्रकांत वाकोडे, गजानन कांबळे, संदीप नितनवरे, नयन अहिरे, विलास नवघरे, अतुल सोनवणे, हेमंत कांबळे, ॲड. पराग नितनवरे, अरविंद कसबे आदी उपस्थित होते.
वैद्य म्हणाले की, बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यामुळे देशाला अनेक फायदे झाले. देशातील साधनसंपत्तीचे त्यामुळे रक्षण झाले. देशात बौद्ध लेण्या मोठ्या प्रमाणात असून, पुरातत्व विभागाकडून पूर्णपणे या लेण्यांचे संरक्षण केले जात नाही; मात्र बौध्द धर्मीयांकडून त्यांची देखरेख आणि संरक्षण केले जाते. याच बौध्द लेण्यांमुळे देशात पर्यटनाला चालना मिळू शकते. भारत हा बुध्दाचा देश आहे, अशी जगभरात ओळख करून देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. जातीयता नष्ट करण्याचे काम संविधानातून करण्यात आले आहे. त्यामुळे देशात सर्वधर्म समभाव आहे. महिलांनाही त्यांचे अधिकार मिळाले. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा आणि रुढी बंद व्हाव्यात म्हणून बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिल’ तयार केले होते; मात्र हे बिल नाकारण्यात आले.
देशातील हिंदू, जैन, शिख आणि बौध्द यांच्यासाठी एकच हिंदू विवाह कायदा बाबासाहेबांनी केला. यामागे समानतेचा विचार आहे. सर्व धर्म आणि जाती एकाच कायद्याखाली आल्यास त्यांच्यातील वाईट प्रथांना आळा बसून, सुधारणा होईल. सर्वांना एकसारखीच वागणूक मिळेल, हा त्यामागचा उद्देश होय. याच आधारावर बाबासाहेबांनी समान नागरी कायद्याची तरतूद केली; मात्र त्यानंतर सरकारने या कायद्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. प्रत्येक जण आपल्या धर्मासाठी वेगळा कायदा करण्याची मागणी करतो. ही मागणी बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि धोरणाच्या विरोधात आहे.
प्रत्येकाला शिक्षण, नोकरी, रोजगार मिळावा म्हणून बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे मागास आणि अविकसित घटकाला प्रवाहात येण्यास मदत होत आहे. आरक्षण ही लाचारी नसून स्वाभीमान आहे. ‘इमेज बिल्टअप’ करण्याचा हा प्रयत्न आहे. कामगार कायदे, प्रसुती काळातील महिलांच्या रजा यासह अनेक कायदे बाबासाहेबांनी केले आहेत.
डॉ. पठाण या वेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा माणूस मुस्लिम समाजात जन्मला नाही. त्यामुळे देशातील मुस्लिम समाज मागे आहे. बाबासाहेबांची 125 वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. हा सामाजिक समतेचा संदेश देणारा महोत्सव आहे. सामाजिक समतेतून बौध्द धर्म समजून घेतला पाहिजे. देशात मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाला अद्यापही आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले नाही. बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौध्द धर्म महान समानतेवर आधारित आहे. अखिल मानवतेचा, शांतीचा संदेश देणारा, जात-पात न मानणारा हा बौध्द धर्म आहे, असेही पठाण म्हणाले.
प्रास्ताविक राहुल काकडे, स्वागत अमरसिंग आदियाल यांनी केले. दयानंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आशिष सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल गायकवाड आणि सहकाऱ्यांचा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.