निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेत समाविष्ट होऊनही समाविष्ट गावांना विकासापासून दूर ठेवण्यात आले होते. महापौरपद मिळाल्यानंतर मागील वर्षभरात या समाविष्ट गावांच्या विकासावर भर दिला. कोट्यवधी रुपयांची कामे वर्षभराच्या कारकीर्दीत सुरू केली असून या गावांचा विकास करून शहराच्या विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला, असे मत महापौर नितीन काळजे यांनी मांडले आहे.
महापौर काळजे यांची वर्षभराची कारकीर्द पुर्ण झाल्याने त्यांनी केलेल्या कामांचा आढावा पत्रकार परिषदेत सांगितला. महापौर काळजे पुढे म्हणाले, समाविष्ट गावांचा विकास २० वर्षांपासून खुंटला होता. मात्र महापौर पदाच्या माध्यमातून या गावांना ख-या अर्थाने न्याय देवू शकलो. आपल्या कारकीर्दीत समाविष्ट गावांसाठी सुमारे सव्वाचारशे कोटींचे रस्त्यांची कामे सुरू होत आहेत. ५० नवीन रस्ते होणार असून त्याचा फायदा या भागातील विकासाला होणार आहे.
सभागृह चालवताना विरोधकांना बरोबर घेऊन काम केले. काम करताना आरोप प्रत्यारोप हे होतच असतात. अनेक कामे केली, परंतु आणखी कामे करणे बाकी आहे. पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी, तसेच आंद्रा, भामा आसखेडचे पाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. येत्या काळात रस्ते वाहतुकीवर काम करण्याचे त्यांनी सांगितले. आमदार महेश लांडगे माझे चांगले मित्र असले, तरी त्यांचा कसलाही रिमोट कंट्रोल आपल्यावर नव्हता. एका वर्षात सर्वाधिक सुमारे अडीच हजार कार्यक्रमांना उपस्थित लावल्याचे महापौर म्हणाले.
महापौरपदाचा राजीनामा हे नाट्य नसून त्यावेळची ती योग्य भूमिका होती. वर्षभराच्या कारकीर्दीवर समाधानी असून महापौरपदाचा अडीच वर्षाचा कालावधीत भरपूर काम करण्याची तयारी आहे. या काळात आणखी कामे पूर्ण करता येतील. मात्र, महापौरपद बदलाबाबत पक्षाचा जो निर्णय असेल, तो निर्णय आपल्याला मान्य राहील, असेही महापौर काळजे यांनी स्पष्ट केले.