निर्भीड न्यूज –
सध्याच्या काळात केवळ देशातच नव्हे; तर विदेशातही लोकप्रिय ठरलेल्या योगामधील ध्यान-धारणा हा महत्वपूर्ण भाग आहे; मात्र ध्यान-धारणेचे मनोशारीरिक परिणाम आणि शब्दात व्यक्त करता न येणारा अनुभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे घेण्याची संधी ‘रिलॅक्स एसेन्स फ्लोट स्पा’च्या रूपाने पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.
ध्यान आणि धारणा या योगाप्रकारांचे महत्व श्रीकृष्णापासून ते संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद अशा सर्वच महान व्यक्तिमत्वांनी केवळ शब्दांनी वर्णन केले असे नाही; तर आपल्या कृतीनेही सिद्ध केले आहे. ध्यान, धारणेने केवळ अध्यात्मिक अनुभूती मिळते असे नव्हे; तर लौकीक आयुष्याला कलाटणी देऊन व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता त्यामध्ये आहे. एकाग्रता, मन:शांती, मन आणि शरीराचे संतुलन; असे अनेक लाभ त्यामुळे मिळतात; मात्र ध्यान आणि धारणा साधण्यासाठी प्रचंड चिकाटी, सातत्यपूर्ण साधना आवश्यक असते; मात्र ‘फ्लोटेशन थेरेपी’ अथवा आयसोलेशन टेंक थेरेपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारेही ध्यानाचा अनुभव देण्याप्रमाणेच त्याचे अनेक लाभ प्राप्त करणे शक्य आहे. त्यासाठी बाणेर येथे ‘रिलॅक्स एसेन्स फ्लोट स्पा’ची स्थापना शंतनू पाबळकर यांनी केली आहे.
पाबळकर यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. या तंत्रज्ञानानुसार एका बंद खोलीमध्ये बसविण्यात आलेल्या ‘बाथ टब’च्या धर्तीवर बनविण्यात आलेल्या ‘पॉड’ या खास टबमध्ये पाणी भरले जाते. या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानाएवढेच ठेवण्यात येते. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या पाण्यात सुमारे 500 किलो विशिष्ट प्रकारचे मीठ विरघळविलेले असते. त्यामुळे पाण्याची घनता मोठ्या प्रमाणावर वाढून टबमध्ये आलेल्या व्यक्तीने कोणताही प्रयत्न न करता त्याचे शरीर पाण्यावर तरंगत राहू शकते. या खोलीतील पूर्ण अंधार आणि सुरुवातीचा काही काळ विशिष्ट पद्धतीने संकलीत केलेल्या शांत सुरावटीच्या संगीताची साथ; यामुळे टबमधील व्यक्ती एकीकडे शारीरिकदृष्ट्या वजनरहीत अवस्थेचा अद्भुत अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे स्नायू, सांधे आणि मज्जातंतू यांना संपूर्ण आराम मिळतो आणि शरीरातील अनेक अपायकारक द्रव्य बाहेर टाकली जातात. या प्रक्रियेत मानसिक दृष्ट्याही विचाररहित शांततेचा अनुभव मिळतो. त्यामुळे ध्यान आणि धारणेमुळे मिळणारे अनेक लाभ मिळविता येतात. ध्यानाची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी दीर्घ साधनेची आवश्यकता असते; तर या यंत्रणेचा उपयोग केवळ एक तास करणाऱ्यांची तब्बल आठ तासाची गाढ झोप या कालावधीत पूर्ण होते; तसेच आठवड्याभरातील शारीरिक आणि मानसिक तणावही दूर होतात; असा दावा शंतनू यांनी केला आहे.
विदेशात 1954 मध्ये शोधल्या गेलेल्या या उपचार पध्दतीला 1980 पासून पाश्चात्य देशात अमाप लोकप्रियता मिळाली. भारतात ही सुविधा प्रथम पुण्यातच उपलब्ध करून देण्यात आली आहे.