निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आता नवीन 99 लाख शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य घेता येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज मुंबई येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. यात 44,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 56,63,282 आणि 59,000 रुपयांपेक्षा कमी असलेल्या 36,73,032 याप्रमाणे एकूण 93,36,314 आणि अंत्योदय अन्न योजनेतील 1 व 2 सदस्य असलेल्या शिधापत्रिका अशा सुमारे 99 लाख शिधापत्रिकांचा नव्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आता 30.9.2016 ऐवजी दि. 30.4.2018 पर्यंतच्या पात्र शिधापत्रिकांचा विचार करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार, दि. 30.4.2018 पर्यंत आधार सिडींग होऊन पात्र ठरविण्यात आलेल्या सर्व लाभार्थ्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.यासाठी लाभार्थ्याने हमीपत्र भरून संबंधित शिधावाटप प्राधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना सुरु करण्यापुर्वी राज्यात सर्व लाभार्थी मिळून एकूण 8 कोटी 77 लाख एवढे लाभार्थी होते. 7 कोटी एवढ्या इष्टांकाच्या मर्यादेत लाभार्थी सामावून घेताना एपीएल (केशरी) शिधापत्रिका देण्याकरीता 1 लाख एवढ्या वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा आगे. सल्याने संगणकीकृत उपलब्ध माहितीनुसार त्यापैकी ग्रामीण भागातील 44,000/- व शहरी भागातील 59,000/- वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचा समावेश करण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेतला होता. राज्यातील आधार नोंदणीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाचलेल्या अन्नधान्याचे वाटप राज्यातील नविन 99 लाख गरजू व गरिब लाभ धारकांना करण्यात येणार आहे, असे बापट यांनी म्हटले आहे.