निर्भीडसत्ता न्यूज –
रोजगार ही देशाची मोठी गरज असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. रोजगार निर्मितीला वाव मिळावा यासाठी हे उद्योग वाढण्याची गरज आहे. केंद्राच्या नव्या उपक्रमामुळे लघु आणि मध्यम व्यवसायाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केला.
येथील गणेश कला क्रिडा मंच येथे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे सबलीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. अनिल शिरोळे, केंद्रीय न्याय विभागाचे सहसचिव सदानंद दाते, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक दत्तात्रय डोके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बँक ऑफ महाराष्ट्रचे सल्लागार वसंतराव म्हस्के, प्रशांत खटावकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृह राज्य मंत्री अहिर म्हणाले की, केंद्र सरकारच्या नव्या उपक्रमामुळे 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ऑनलाईन तेही केवळ 59 मिनिटांत मिळू शकते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये 6 कोटी पेक्षा अधिक रोजगार आहे. या उद्योगांना प्रोत्साहन देणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. प्रधनमंत्री मोदी यांनी सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. भारत देश शेतीप्रधान आहे. येथील तरुणांच्या ठायी असलेल्या कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी कौशल्य भारत आणि मेक इन इंडिया हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. अन्य देशांनी भारताकडे बाजारपेठ म्हणून न पहाता उत्पादकांचा देश म्हणून पहावे, यासाठी सरकारने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे, असे नमूद केले.
अहिर म्हणाले की, या उपक्रमातून रोजगार निर्मिती, उत्पादकेत वाढ आणि निर्यातीस प्रोत्साहन मिळणार आहे. मुद्रा योजनेमधून पुणे जिह्यात सर्वाधिक कर्जवाटप झाल्याबद्दल अहिर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले.
गृहउद्योग, ग्रामोद्योग, कुटीरउद्योग ही संकल्पना नवीन नसून जुनीच आहे. मात्र, त्याला या सरकारने फक्त चालना आणि गती दिली आहे. देशातील खनिज संपत्ती आणि नैसर्गिक साधन समृध्दीचा योजनेमध्ये वापर झाला तर देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.