निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने धोरण तयार केलेले आहे. या धोरणानुसार वर्षातून फक्त एप्रिल व मे या दोनच महिन्यात अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यासाठी ज्या अधिकारी, कर्मचार्यांना एकाच विभागात सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा अधिकारी, कर्मचार्यांची माहिती पाठविण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
नगरसेवक, पदाधिकार्यांकडून मर्जीतल्या अधिकारी, कर्मचार्यांच्या बदलीसाठी वर्षभर पालिका प्रशासनावर दबाबतंत्र वापरले जाते. बदल्याबाबात न्यायालयात दाखल एका याचिकेवर उच्च न्यायालयाने पालिकेने बदल्याबाबत धोरण करण्याचे निर्देश दिले होते. या धोरणानुसार पालिका प्रशासनाने 2015 मध्ये बदल्यासाठी नवीन धोरण स्विकारले आहे. या धोरणानुसार सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या चारही वर्गातील अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या वर्षांतून फक्त एप्रिल व मे या दोनच महिन्यात होणार आहेत.
प्रत्येक कर्मचार्याचे तीन वर्षांनी कामाचे स्वरुप बदलणे आणि सहा वर्षांनंतर दुसर्या विभागात बदली करणे आवश्यक आहे. या धोरणाप्रमाणे यावर्षी बदल्या करण्यासाठी संबधित विभागप्रमुख आपल्या विभागातील बदल्यासाठी पात्र अधिकारी, कर्मचार्यांची यादी 31 मार्चपर्यंत प्रशासनाकडे पाठवावी, अशी सूचना करण्यात आली आहे. थेट कर्मचार्यांचे अर्ज किंवा शिफारशी प्रशासानकडे स्विकारल्या जाणार नाहीत. पात्र अधिकारी, कर्मचार्यांची माहिती आल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात आयुक्तांच्या आदेशानुसार बदल्या केल्या जाणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.