मुंबई |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भयभीत होऊ नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबईपाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना हा जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या जनतेला धीर देण्याचे काम सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे. या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून आरोग्य विभागाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे.
कोरोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे. त्यासोबतच मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांचीदेखील मदत घेण्यात येत आहे.
राज्यात येणाऱ्या होळीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असून या होळीमध्ये कोरोनाचे संकट जळून खाक व्हावे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. होळीचा सण साजरा करताना त्याचे स्वरुप मर्यादित ठेवावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, रवी राणा, राम कदम यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला