निर्भीड न्यूज –
‘भारत माता की जय’ म्हणण्याला माझा विरोध नाही, परंतु हे ‘नागपूर’मधून सांगितले जात असेल, तर मी भारत माता की जय म्हणणार नाही. ‘भारत माता की जय’ म्हणजेच राष्ट्रवाद या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो. हे सर्व मुसलमानांना वेठीस धरण्यासाठी सुरू आहे. सगळेच हिंदु राष्ट्रभक्त आहेत याला पुरावा काय? आरएसएस स्वातंत्र्य लढ्यात कधीही नव्हती. गांधीवादाला, नेहरुंच्या विचाराला आरएसएसने वेगळी संघटना स्थापन करून विरोध केला. ब्राह्मण व्यक्तीला माझा विरोध नाही. ब्राह्मण वृत्तीला माझा विरोध आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पिंपरी येथे केले.
भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवार, दि. 7 एप्रिल रोजी पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात मुणगेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक सद्गुरु कदम, माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या श्यामला सोनवणे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष गौतम आरकडे, संदीपान झोंबाडे आदी या वेळी उपस्थित होते.
खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर या वेळी म्हणाले की, या देशातील सर्व जमीन स्त्रियांच्या नावे करावी व ती विकण्याचा अधिकार पुरुषांना नसावा, अशी मागणी मी संसदेत करणार आहे. महिलांना, दलितांना, आदिवासींना, कष्टकरी कामगारांना, शेतक-यांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी कार्य केले; परंतु देशातील जातीयवाद संपला नाही. दादरच्या हिंदु कॉलनीत आणि पुण्याच्या सदाशिव पेठेत जेव्हा स्वयंस्फुर्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होईल तेव्हाच देशातील जातीयवाद संपला, असे म्हणावे लागेल. डॉ. आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांचे विचार समाजापुढे घेऊन जायची आज खरी गरज आहे. गेल्या दोन वर्षांत ज्या प्रतिगामी शक्तींच्या हाती सत्ता आहे. त्यांनी घटनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवाद हा व्यक्तीच्या धर्मावर व कार्यक्षमता जातीवर ठरायला नको. हुशार मुलांना या जातीव्यवस्थेमुळे आत्महत्या करावी लागते आहे. यापूर्वी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देशभरातील विद्यापीठात तिरंगा फडकविला जायचा; परंतु या सरकारने एका समाजाला लक्ष करण्यासाठी तिरंग्याचे आणि ‘भारत माता की जय’चे राजकारण करीत अराजक माजविण्याचा प्रकार केला आहे. धर्माच्या नावाखाली राष्ट्रवाद पेरला तर हा देश एक राहणार नाही. अशीही भीती डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केली.
या देशावर जशी हिंदूंची मालकी आहे. तशीच इतर सर्व धर्मातील व्यक्तींची आहे. या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा देश आहे. बेकारीचा, सिंचनाचा, रस्ते, पाणी, आरोग्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी हे सरकार राजकारण करीत आहे. विद्वत्तेमध्ये आणि अखिल मानवाचा विचार करून कार्य करण्यामध्ये नेल्सन मंडेला व माओ त्से सुंग नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले जाते. आंबेडकरांनी ‘हिंदु कोड बील’ आणून महिलांना समान हक्क दिले. तरी देखिल आजही देवळात महिलांना प्रवेश नाकारला जातो. आंबेडकरांनी 1942 ते 46 साली कामगारमंत्री असताना महिलांना प्रसुतीची पगारी रजा, सर्व कामगारांना जादा कामाचा दीडपट पगार, कामावर अपघात झाल्यास औषध खर्च व नुकसान भरपाई हे कायदे केले. सिंचन प्रकल्पावर वीजनिर्मिती, पाण्याचे धोरण, प्राध्यामिक शिक्षणाचे प्रश्न, छोट्या शेतक-यांचे प्रश्न, औद्योगिकीकरणाचे प्रश्न, कृष्णा, कावेरी पाणी प्रश्न यावर लेखन केले आहे. अशी माहिती डॉ. मुणगेकर यांनी या वेळी दिली.
शहराध्यक्ष सचिन साठे यांनी स्वागत केले. गौतम आरकडे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. क्षितिज गायकवाड यांनी आभार मानले.