निर्भीड न्यूज –
जलपर्णीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. ही जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ही जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे. मोशी येथे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात येत आहे.
नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेला दरवर्षी तरतूद करावी लागत असते; मात्र निविदा प्रक्रिया राबविण्यास महापालिका प्रशासनाकडून विलंब होतो. जलपर्णी काढावी लागणार असल्याचे माहीत असतानाही महापालिका प्रशासनाने यंदाही ही निविदा प्रक्रिया उशिरा राबविली. त्यामुळे जलपर्णीत भरमसाठ वाढ झाली. त्याचा नाहक त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून जलपर्णीचा विषय गंभीर झाला आहे. जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने मशीन खरेदीही केली; मात्र या मशीनचा उपयोग झाला नाही. परिणामी मशीनवर झालेला खर्च वाया गेला. गेल्या वर्षी या मशीनच्या साह्याने जलपर्णी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो प्रयत्न फसला. निविदा प्रक्रिया राबवून जलपर्णी काढण्याचा ठेकाही गेल्या वर्षी देण्यात आला होता; मात्र तोपर्यंत पावसाळा तोंडावर आला होता. त्यामुळे जलपर्णी काढण्याचे काम ठेकेदाराने संथ गतीने केले. पावसाळ्यात पूर आल्यानंतर जलपर्णी वाहून गेली. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवून देण्यात आलेल्या ठेक्याचा फारसा उपयोग झाला नाही. यातून केवळ ठेकेदाराला आर्थिक लाभ झाला.
यंदा इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात येत आहे. मोशी येथे या कामाला सुरुवात झाली आहे. ही जलपर्णी काढण्याचे काम यंदा वेगात सुरू आहे. जलपर्णी काढल्यामुळे नदीतील प्रदूषण कमी होऊन डासांची पैदास होण्यास आळा बसेल. परिणामी शहरवासीयांना दिलासा मिळेल.
कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी
प्रत्येक वर्षी शहरातील नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात होते. महापालिका प्रशासनाकडून याबाबत त्वरित उपाययोजना केल्या जात नाहीत. याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले जाते. पावसाळा संपल्यानंतर त्वरित यावर उपाययोजना करून जलपर्णी होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. हिवाळ्यात जलपर्णीचे कमी प्रमाणात असते. त्या वेळेसच जलपर्णी हटविली पाहिजे. जेणेकरून खर्चात बचत होऊन डासांचा उपद्रव होणार नाही.