निर्भीडसत्ता न्यूज –
अणुऊर्जेचा वापर हा वीज निर्मिती, कॅन्सर रोगांवर इलाज, औद्योगिक क्षेत्र, शेती आणि अन्न धान्यांची साठवणूक, मूलभूत संशोधनांमध्ये केला जातो. शेती क्षेत्रामध्ये अणुऊर्जेचा वापर करून अनेक महत्वपूर्ण शोध लावले असून शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि शेती उत्पादन वाढवावे. असे आवाहन बीएआरसीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. एस.टी.म्हेत्रे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे मुंबईतील भाभा ॲटोमीक रिसर्च सेंटरच्या (बीएआरसी) वतीने ‘शांतता, शक्ती आणि प्रगती साठी अणु ऊर्जा’(ATOMIC ENERGY FOR PEACE, POWER AND PROSPERITY)या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत मार्गदर्शन करताना डॉ. एस.टी. म्हेत्रे बोलत होते. यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रिजचे मुख्य व्यवस्थापक जी. के. पिल्लई, इंडियन न्युक्लिअर सोसायटीचे सचिव आर. के. सिंग, पीसीओेईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, बीएआरसीचे समुह संचालक आर. एस. यादव, ज्येष्ठ संशोधक हेमंत शिंपी, संगणक विभाग प्रमुख प्रा. महेंद्र साळुंके आदींसह अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. म्हेत्रे मार्गदर्शन करताना म्हणाले की, उत्परिवर्तन ही निसर्गनिर्मित प्रक्रिया असून जनुकांमध्ये बदल होत असतात. परंतु हे बदल होण्यासाठी जास्त काळ लागतो. विकिरणांच्यामुळे ही बदल होण्याची क्रिया आपण अधिक वेगाने घडवून आणू शकतो. कारण विकिरणांमुळे जनुकांमध्ये बदल केले जातात आणि त्यापासून नवीन प्रजाती विकसित केली जाते. अशा प्रकियेच्या मदतीमुळे भाभा अणु संशोधन केंद्राने पिकांच्या 42 जाती विकसित केल्या आहेत. तसेच कडुनिंब एक प्रभावी कीड नाशक आहे. लिंबोळ्याच्या बि मध्ये तेल असते ज्यामध्ये अझाडिरॅक्टिन नावाचा घटक असतो. त्यामुळे लिंबोळीमध्ये कीडनाशक गुणधर्म आढळतात. याचे तंत्रज्ञान बीएआरसी आणि विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT) नागपूर यांनी मिळून विकसित केले आहे. यामध्ये लिंबोळीपासून पावडर बनवली जाते आणि त्याच्या कणांची जाडी जसजशी कमी होईल तसे त्याचा प्रभाव वाढल्याचे आढळून आले आहे. हे तंत्रज्ञान खाजगी कंपनीला हस्तांतरित केलं असून थोड्याच काळात यावर आधारित उत्पादन बाजारांत दाखल होईल. रासायनिक औषधे आणि खतांच्या अतीवापरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नापीक जमिनीची आकडेवारी फुगत चालली आहे. या रासायनिक शेतीने माती, हवा, पाणी जेव्हा मृतवत होईल. तेंव्हा मानवाचे डोळे उघडतील आणि मगच नैसर्गिक शेतीचे महत्व लोकांना समजेल व लोक नैसर्गिक शेतीकडे वळतील. परंतु आता जमिनी खराब होण्याची वाट न बघता सर्व शेतक-यांनी लवकर या पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. असे घडले तर भविष्यकाळ उज्वल होईल यात शंका नाही. भाभा अणु संशोधन केंद्राने अशा प्रकारे शेतीच्या विविध क्षेत्रामध्ये भरीव योगदान केले आहे. शांततेसाठी अणु ऊर्जेचा वापर कसा करता येऊ शकतो हे येथील शास्त्रज्ञांनी आपल्या अथक प्रयत्नाने आपल्याला दाखवून दिले आहे. आता या तंत्रज्ञानाचा सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेही आवाहन डॉ. एस.टी. म्हेत्रे यांनी केले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी मार्गदर्शन केले. स्वागत प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, सूत्रसंचालन प्रा. मानसी कुरकुरे आणि आभार प्रा. जमीर कोतवाल यांनी मानले.