निर्भीडसत्ता न्यूज –
आंतरराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघ, श्री गोविंदधाम मंदिर यांच्या वतीने यमुनानगर ते आकुर्डी या मार्गावर श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेसाठी शेकडो भाविक-भक्तांनी हजेरी लावली. यमुनानगर येथील दत्त मंदिरापासून ते आकुर्डी येथील गोविंदधाम मंदिरापर्यंत भक्तांनी श्रीजगन्नाथ रथ भक्तिभावाने ओढत मंदिरापर्यंत पोहोचवला.
निगडी यमुनानगर येथील दत्तमंदिरापासून रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, नगरसेविका रेखा दर्शिले, मावळ पंचायत समिती सदस्य नितीन घोटुकले, माजी नगरसेवक रवींद्र खिलारे, उद्योजक शशी आखाडे, उद्योजिका ममता पांडे, उद्योजक मदन सोनिगरा, समाजसेवक विजय दर्शने आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
रोहिणी कुमार यांनी उपस्थितांना सामाजिक एकतेचा संदेश दिला. यावेळी ते म्हणाले की, वर्तमान काळात संपूर्ण देशातील सामाजिक एकता ऐरणीवर आली आहे. समाजामध्ये अंतर्गत द्वेषाची भावना वाढत आहे. ही वाढत असलेली द्वेषाची भावना समाजाच्या प्रगतीसाठी अडथळा बनली असून तिला संपवणे समाजाचा जबाबदार घटक म्हणून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भक्तिभावातून सामाजिक एकता टिकवून ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्व धर्म, जात, पंथ विसरून श्रीजगन्नाथ रथयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रथयात्रा महोत्सवामध्ये सकाळी मंगल होम यज्ञ करण्यात आले. त्यानंतर भजन व प.पू लोकनाथ स्वामी यांचे प्रवचन झाले. ही रथयात्रा यमुनानगर येथील दत्त मंदिरापासून सुरु झाली. पुढे निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल – लोकमान्य हॉस्पिटल – म्हाळसाकांत चौक – संभाजी चौक – बिजली नगर पूल – आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गे इस्कॉन श्री गोविंदधाम मंदिर येथे या रथयात्रेच्या समारोप झाला. रथयात्रेनंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.