निर्भीडसत्ता न्यूज –
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी दुबईत आज त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. तर दुसरी मुलगी जान्हवी चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीस सुरूवात केली.
तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. ‘ज्यूली’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ‘सोलावा सावन’ (१९७८) साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात श्रीदेवी यांनी नायिकेची भूमिका साकारत मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हिंमतवाला’, ‘मवाली’, ‘मास्टरजी’, ‘मकसद’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदणी’, ‘चालबाज’ ‘खुदा गवाह’ आदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले. श्रीदेवी यांनी ‘सदमा’ सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात कायम आहे.