पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची तहान भागविणार्या पवना धरण 100 टक्के भरले आहे. तरीही, महापालिकेकडून संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तब्बल दोन वर्षांपासून एक वेळ पाणी मिळत असल्याने सत्ताधारी व विरोधकन नगरसेवकांसह रहिवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत.
धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पवना धरण पूर्णपणे भरले आहे. असे असतानाही, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा कायम आहे. धरणातील पाणी साठा कमी झाल्याने दक्षता म्हणून तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. त्यास विरोध होऊनही प्रशासन व पाणीपुरवठा विभाग जुमानले नाही.
शहराची लोकसंख्या वाढून 27 लाख झाल्याने दररोज संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करता येत नाही, असे कारण पुढे केले जात आहे.
सध्या 480 ते 490 एमएलडी पाणी पवना नदीतून उचलले जाते. तसेच, एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जाते. असे एकूण 510 ते 520 एमएलडी पाणी दररोज शहराला पुरविले जात आहे. दोन दिवसांचे पाणी एक वेळ समन्यायिक पद्धतीने दिले जात असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. असे असले तरी, काही भागांत टंचाई तसेच, गढूळ पाण्याच्या तक्रारी कायम आहेत. महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय घेतलेल्या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी पाण्याबाबत तक्रारी केल्या आहेत. महापौर ढोरे यांनीही नाराजी व्यक्त करीत योग्य दाबाने शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, धरण भरले तरी, दिवसाआड पाणीपुरवठा कामय राहिल, असे पालिकेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्त, पदाधिकारी, गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय :
पवना धरण पूर्ण भरले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा दिवसाआड कायम ठेवायचा की दररोज पाणी द्यायचे, या संदर्भात आयुक्त, महापौर, महापालिकेचे पदाधिकारी व गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. जो निर्णय होईल त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी सांगितले.