पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा, कुसगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व शाळेच्या मुख्याध्यापिका आशा मानकर यांनी पुष्पहार अर्पण केले.
रयत विद्यार्थी विचार मंचचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे, महाराष्ट्र सहसचिव भाग्यश्री आखाडे, लोणावळा शहराध्यक्ष प्रणाली कावरे, मावळ तालुका अध्यक्ष अतुल वाघमारे, मावळ महासचिव विक्रांत शेळके, शाळेचे शिक्षक महादेव शेलार, नितीन बोंगळे आदी या वेळी उपस्थित होते.
संस्थेच्या लोणावळा शहरप्रमुख प्रणाली कावरे यांनी आजच्या जिजाऊंच्या लेकींनी तलवाररुपी वही व पेन हाती घेऊन शैक्षणिक क्रांती केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय आशा मानकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक करत शिकणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन प्रोत्साहित करणे हे खरे महापुरुषांना अभिवादन असल्याचे सांगितले.
शाळेची विद्यार्थिनी श्रेया शिंदे हिने जिजाऊंच्या वेशात ‘मी जिजाऊ बोलतेय’ ही एकांकिका सादर केली. मावळ महासचिव प्रा. विक्रांत शेळके यांनी शिक्षण, माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद या विषयावर व्याख्यानपर मार्गदर्शन केले.