निर्भीडसत्ता न्यूज –
चऱ्होलीतील तनिष्का अमोल आरूडे या चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. तसेच हा गुन्हा करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी दिघीतील भाजपच्या नगरसेविका हिराबाई घुले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले आणि तनिष्काच्या आई-वडिलांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे गुरूवारी (दि. ६) केली.
या सर्वांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, “चऱ्होलीतील तनिष्का अमोल आरूडे या चार वर्षांच्या मुलीचा ती घराजवळ खेळत असताना अपहरण करण्यात आले. आरोपी शुभम विनायकराव जामनिक आणि प्रतीक ऊर्फ गोलू अरूण साठले या दोघांनी खाऊचे आमिष दाखवून तनिष्काला बोलावून घेतले आणि नंतर तिचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तनिष्काचा मृतदेह निर्दयीपणे बॅगेत भरून अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे नेला. तेथे मृतदेह अर्धवट जाळून तो जमिनीमध्ये गाडला.
या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र यापुढील पोलिस प्रक्रिया लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात योग्य ते पुरावे तातडीने सादर करावेत. त्याचप्रमाणे या गुन्ह्याचा निकाल लवकर लागण्यासाठी तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी अॅड. उज्ज्वला पवार, अॅड. अरूण ढमाले आणि अॅड. मकरंद औरंगाबादकर यांची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी तनिष्काचे आई वडिल अमोल आरूडे आणि योगिता आरूडे यांनी केली आहे.