निर्भीडसत्ता न्यूज़ –
पिंपरी: प्रतिनिधी
रिंगरोडच्या प्रश्नामुळे शहरातील वातावरण भयभीत झाले असून कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने शहराचे पालक म्हणून महापालिका सर्वसाधारण सभेत लक्षवेधी सूचना मांडून चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौरांकडे केली आहे.
भाऊसाहेबर भोईर यांनी महापौर नितीन काळजे यांना लक्षवेधी सूचना घेण्याबबात पत्र दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण राजकीय पक्ष म्हणून वेगवेगळी भूमिका असली, तरी सभागृहात शहराचे विश्वस्त म्हणून भूमिका बजावावी लागते. रिंगरोड प्रस्तावित असताना तेथील जमिनींची खरेदी-विक्री करून दलालांनी नागरिकांना फसवले आहे. तेथील बांधकामांना महापालिका, प्राधिकरण, एमएससीबी यांनी सेवा-सुविधा का पुरविल्या ? वेळीच अटकाव प्रशासनाकडून केला गेला नाही. त्याची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना आता भोगावी लागत आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. पालिका सभेत लक्षवेधी सूचना घेऊन त्यावर सर्व नगरसेवकांनी आपली मते मांडावीत, अशी मागणी भोईरांनी केली. या रिंगरोडसाठी पर्यायी मार्गाचा विचार करून ही घरे वाचविण्याचा प्रयत्न करावा, असेही भोईर यांनी म्हटले.