निर्भीडसत्ता न्यूज –
सध्या स्पर्धेचा काळ आहे. त्यामध्ये प्रत्येकजण गुणांच्या मागे पळताना दिसतात. मात्र विद्यार्थ्यांनी गुणांच्या मागे न धावता नितीमुल्यांमध्ये विकास करावा, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (दि. 31) व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन श्री गोविंदधाम) रावेत यांच्यातर्फे भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे, ज्ञानप्रबोधिनीचे प्रमुख भाऊ अभ्यंकर, मॉडर्न स्कूलचे अध्यक्ष शरद इनामदार, सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष गोविंद दाभाडे आदी उपस्थित होते. आयुक्त हर्डीकर पुढे म्हणाले, आपल्या मुलांचे गुण वाढविण्यापेक्षा त्यांची नितीमुल्ये वाढविण्यावर शिक्षक व पालकांनी भर द्यावा. कारण, सध्याच्या मुलांमध्ये नितीमुल्यांचाच अभाव आहे.
भगवद्गीता प्रज्ञा शोध परीक्षेत शहरातील ३२ शाळांमधील २ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये शहरातील प्रथम आलेल्या सहा गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यात पाचवी ते सातवीच्या गटात आदिनाथ बोरसे पहिला, अभिषेक बनसोडे दुसरा आणि अंजना पासवान हिचा तिसरा क्रमांक आला. तर, आठवी ते दहावीच्या गटात राज कांबळे पहिला, सिद्धी पुरेचा दुसरा आणि निकीता विनायक सरता हिचा तिसरा क्रमांक आला आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन विलास चव्हाण, विजय पाखळे, ममता जयसिंगपुरे, गंगाधर सोनवणे, गुरु गौरांग दास यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन धनश्री शिंदे व दिनेश कुलकर्णी यांनी केले. तर आभार गुरु गौरांगदास यांनी केले.