निर्भीडसत्ता न्यूज –
आपला देश विविधतेत एकता असलेला देश असल्याने भाषा हा मुद्दा गौण आहे. भाषेपेक्षाही भावना महत्वाच्या असतात. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती करायची आहे. त्यामुळे सामाजिक विषमता बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्रित पणे देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. चिंचवड मल्याळी समाजाला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महापौर नितीन काळजे, नगरसेवक बाबू नायर, राजू मिसाळ,अनुराधा गोरखे, महापालिका विरोधी पक्ष नेते योगेश बहल, चिंचवड मल्याळम समाजाचे टी. पी विजयन, जी. रघुनाथान, पी.व्ही जनार्दन,टी. व्ही. भास्करण, कामगार नेते राजन नायर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले, मल्याळी माणूस हा अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू आहे. आपल्या याच गुणाच्या आधारे त्याने देशात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. केरळ निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या निसर्गाचा उपयोग करत त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात अत्यंत भरीव कामगिरी केली आहे. त्याच प्रमाणे केरळ रबर उद्योग आणि केरळी नृत्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी इतरही अनेक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
बापट म्हणाले, केरळी समाज जेथे राहतो तेथील संस्कृती आत्मसाद करतो. महाराष्ट्रातही त्यांचे योगदान अमूल्य आहे. हे राज्य १००टक्के साक्षर असणारे आहे. याचाही आम्हाला अभिमान वाटतो. मराठी माणसा सोबतच मल्याळी समाजाचा ही पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रगती मध्ये महत्वपूर्ण वाटा आहे. या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका त्यांच्या पाठीशी राहील असं ही ते म्हणाले.
महापौर नितीन काळजे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये देशाच्या सर्व भागातून नागरिक स्थायिक झाले असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.
नगरसेवक बाबू नायर यांनी पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक शहराच्या जडणघडणीत केरळी समाजाचं योगदान असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तर जी. रघुनाथान यांनी चिंचवड मल्याळम समाजाच्या ५० वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला.