निर्भीडसत्ता न्यूज –
कंपनी प्रशासन काढणार दहा दिवसात सकारात्मक तोडगा
पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील मे. अल्फा लवाल कंपनी प्रशासनाने कंपनीतील 402 कामगारांना 1 ऑक्टोबर, 2013 रोजी कामावर येण्यास मनाई केली. उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष काम करणा-या या कामगारांना कंपनी सेवेत कायम करावे अशी कामगारांनी मागणी केली होती. मागील चार वर्षांपासून कर्मचारी विविध मार्गाने कंपनी प्रशासनास विनंती करीत आहेत. परंतु कंपनीने त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली अल्फा लवाल कंपनीमधील 402 कामगारांनी आंदोलन केले. कामगारांच्या प्रश्नावर कंपनी प्रशासन दहा दिवसात सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उपकामगार आयुक्तांनी कामावरून कमी केलेल्या कामगारांना त्वरित रुजू करून घेऊन औद्योगिक शांतता टिकवण्याबाबतचे पत्र त्याच वेळी देण्यात आले होते. तसेच कंपनीचा कंत्राटी कामगार भरतीबाबतचा परवाना शासनाने रद्द केला आहे. परंतु त्या आदेशास न जुमानता कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आलेली आहे. मागील चार वर्षांपासून 402 कामगार न्यायासाठी लढत आहेत, त्यामुळे कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे यशवंत भोसले म्हणाले.
अल्फा लावाल कंपनीतील अधिकारी ऋषिकेश विस्तूरीकर यांनी दहा दिवसांमध्ये संघटनेसमवेत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा यशवंत भोसले यांनी केली.