निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका निवडणुकीत यमुनानगर प्रभागातील जनतेने शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख सुलभा उबाळे यांना घरी बसविले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारले. त्यांचा वारंवार पराभव होत असल्याने त्यांना नैराश्य आले असून या नैराश्यातून त्या भाजपवर आरोप करतात. त्यांनी राजकीय कारकिर्दीत विकासकामे करण्यापेक्षा ‘सेटलमेंट’ करण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळे त्यांना आता बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे, सडेतोड प्रत्युत्तर भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य प्रा. उत्तम केंदळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी सुलभा उबाळे यांनी भाजपवर आरोप केले होते. भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचार वाढला आहे. सल्लागारांवर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जाते, असा आरोप केला होता. या आरोपाला भाजपचे नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उत्तम केंदळे म्हणाले की, सुलभा उबाळे यांना यमुनानगर परिसरातील सुज्ञ जनतेने घरी बसविले आहे. त्यामुळे आता आपण शहराच्या नेत्या असल्याचे भासविण्याचा त्या केवलिवाणा प्रयत्न करतात. आपल्यासमोर मोठी झालेले मुले नगरसेवक, स्थायी समिती सदस्य झाले आहेत. यामुळे त्यांच्या पोटात दुखते. आम्ही चांगली कामे करत आहोत. जनतेत मिसळतो, त्यांची कामे करतो यामुळे त्यांना वाईट वाटते.
उबाळे या आजवर भाजपच्या मतांमुळे यमुनानगर प्रभागातून निवडुण येत होत्या. यमुनानगर परिसर हा खरे तर भाजपचा बालेकिल्ला आहे. परंतु, आजवर युतीचा धर्म पाळून आम्ही त्यांना निवडुण देत होतो. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेली निवडणुक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यात उबाळे यांना प्रभागातील सुज्ञ जनतेने घरी बसविले आहे. त्यामुळे त्या आता भाजपवर आरोप करत सुटल्या आहेत. त्यांनी भाजपवर टीका करण्याअगोदर आपल्याला जनतेने घरी का बसविले, याचे आत्मपरिक्षण करावे, असा सल्लाही केंदळे यांनी दिला आहे.
भाजपने आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु केली आहेत. ही विकासकामे पाहून शिवसेनेच्या नेत्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करत सुटले आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी 15 वर्षात भोसरी मतदार संघात खासदार निधीतून केलेले एखादे मोठे काम दाखवावे, असेही ते म्हणाले. खासदारसाहेब भाजपमुळेच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजवर टीका करताना विचार करणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना घरी बसविणार आहे, असेही नगरसेवक केंदळे म्हणाले.