51 व्या ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता
निर्भीडसत्ता न्यूज –
सद्गुरु बरोबर आहे, हा भाव ठेवून कोणतेही कार्य केल्यास यश निश्चित आहे. कोणाचा द्वेष, मत्सर करताना सद्गुरु पाहत आहे, हे विसरु नका. प्रयत्नांवर लक्ष ठेवल्यास शक्ती वाया जात नाही. परिस्थिती बदलण्याच्या मागे लागू नका. मनस्थिती बदला मनस्थिती बदलली की परिस्थिती आपोआप बदलते, असे प्रबोधन जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी केले. तसेच मनस्थिती बदलण्यासाठी साधना करा आणि अडचण येऊ नये. त्यासाठी सर्वांचे भले मानत रहा. चांगली संगत ठेवा, असेही ते म्हणाले.
आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराच्या वतीने भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानात आयोजित केलेल्या 51 व्या ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्यात ‘सुखी जीवनाचे गुपित’ या विषयावरील तिसरे पुष्प प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी (दि.14) गुंफले. तत्पुर्वी, आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै यांना नगराध्यक्षा वैजंता उमरगेकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक राहुल जाधव, कुंदन गायकवाड, संतोष लोंढे, नितीन लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, राजेंद्र लांडगे, विलास मडेगिरी, संजय नेवाळे, वसंत बो-हाटे, नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, कमल घोलप, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, यशोदा बोईनवाड, योगिता नागरगोजे, नम्रता लोंढे, स्वीनल म्हेत्रे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, दिनेश यादव आदी उपस्थित होते.
सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै म्हणाले, सुखी जीवनाचे गुपित कृतज्ञतेमध्ये आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचे शिकले पाहिजे. ज्याला कुठे थांबायचे हे कळते, त्याची प्रगती होते. आयुष्यात कर्म खूप महत्वाचे आहे. संचित, प्रारंध आणि क्रियामन असे तीन प्रकारचे कर्म आहे. आपल्या वाट्याला पुण्य, पाप, गुण आणि अवगुण येत असतात. चांगल्या संगतीत गुण वरती येतात. तर वाईट संगतीत अवगुण वरती येतात. अवगुण न येण्यासाठी जीवनविद्या जगली पाहिजे. त्यामुळे पापाला लागणारी परिस्थिती निर्माण होत नाही.
समाजात व्यसनाधिता वाढत चालली आहे. मोबाईल, व्हॉटस् अॅपचे व्यसन देखील घातक असून ही व्यसने पापाला वरती यायला अनुकूल परिस्थिती निर्माण करतात, असे प्रबोधन करत सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै म्हणाले, चूक झाल्यास दुस-याला द्वेष न देता चूक मान्य करावी. शांत रहाणे खूप गरजेचे आहे. शांत राहण्यासाठी प्रार्थना म्हणा प्रार्थना तुम्हाला शांत ठेवेल. अंर्तमन वर घेऊन जाते. तर बहिरमन खाली घेऊन जाते. बहिरमन चांगल्या विचाराने भरले पाहिजे. त्यासाठी प्रार्थना करत राहिले पाहिजे. ज्याची चूक झाली आहे. त्याला स्वत:ला सांगावी. इतरांना सांगू नका, चुकीचा बोबाटा करु नका. टोमणे मारु नयेत, कोणाला दुखवू नये, इतरांबाबत कोणाला सांगू नये, ही सगळी दुष्यकर्म आहेत. कर्म करताना नेहमी विचार केला पाहिजे. आपण समोरच्याला सुख देतो की दु:ख देतो.
कोणाचा मत्सर करु नये, मत्सर केल्यास आपला स्थर वाढत नाही. मत्सराचे रुपांतर द्वेषात, द्वेषाचे तिरस्कारात होते. मत्सर आणि द्वेष केल्यास आपण गाळात जाणार आहोत, हे लक्षात ठेवावे. द्वेष, मत्सर करून कोणाचे भले होत नाही. त्याउलट ज्याचा मत्सर कराल, त्याची प्रगती होते. वर्तमानकाळत जगले पाहिजे. भविष्य आणि भूतकाळ वगळत बसू नये. कोणतेही कार्य करताना लक्ष्य देऊन करावे, असे प्रबोधन सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै यांनी केले. सुखी जीवनाचे गुपित पुण्य आहे. त्यामुळे पुण्याई जमा करणे महत्वाचे आहे. अट्टाहासाने सत्कर्म करा, निग्रहाने दृष्यकर्म टाळा असेही ते म्हणाले. आयुष्यात सतत कृतज्ञ रहा, मी पणा करु नका, असेही प्रल्हाद पै म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, प्रत्येक भक्त सुखाच्या मागे धावत चालला आहे. त्याला सुखाचा मंत्र देण्याचे काम सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै करत आहेत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे प्रत्येकाच्या मनात बिंबविण्याचे कार्य प्रल्हाद दादा करत आहेत. प्रत्येकजण स्वत:च्या जीवनाचा शिल्पकार आहे. हे सोप्या भाषेत सांगण्याचे कार्य सद्गुरुंनी केले. ते कार्य प्रल्हाद दादा अहोरात्र करत आहेत. समाजाला सुधारण्याचा, दिशा दाखविण्याचे काम जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्यात भर घालण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले आहे, असेही खासदार बारणे म्हणाले.